UP Bus Fire : धावत्या बसला लागलेल्या आगीत 2 लहानग्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये ही मन सून्न करणारी घटना घडली आहे. बस बिहारहून दिल्लीला जात होती. मात्र अचानक लखनौमध्ये या बसला आग लागली. बसमध्ये 80 प्रवाशी प्रवास करत होत. गुरुवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बसला आग लागल्यानंतर बसमध्ये धापवळ सुरु झाली. बसमध्ये प्रवाशी जास्त असल्याने सर्वांना बाहेर पडायला वेळ लागला. बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसच्या मागच्या भागात असलेले अनेकजण बसमध्येच अडकून पडले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
आगीने काही वेळातचं रौद्र रुप धारण केले. क्षणात बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. त्यामुळे वेळेवर बसमधून बाहेर पडू न शकल्याने दोन लहान मुलांसह पाच प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झाला.
(नक्की वाचा - Road Accident : अपघातग्रस्त मित्राला भेटायले निघाल्या, वाटेतच मृत्यूने गाठलं; दोन मैत्रिणी जागीच दगावल्या)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नसल्याचे समोर आले आहे.
बसला आग नेमकी कशी लागली याचे कारण अजून समजले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रत्येकी पाच किलोचे सात गॅस सिलिंडर होते. मात्र एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे सिलेंडर आगीचं कारण नाही, हे स्पष्ट झालं आहे. तपासानंतर आगीचं नेमकं कारण काय होते हे समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.