भारतात कोविड-19 रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या नऊ दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्या 1300 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ज्यामुळे देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या वाढून 3758 पर्यंत पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1400 सक्रीय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 रुग्णांची नावे नोंदविण्यात आली आहेत. गुजरात 320, पश्चिम बंगाल 287, कर्नाटक 238, तमिळनाडू 199 आणि उत्तर प्रदेशात 147 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रुग्णसंख्या वाढण्याचं कारण काय?
कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागील कारण चाचणीत केलेली वाढही असू शकते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अद्याप कमी आहे. आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या निरीक्षणाखाली सर्व राज्यांमधील स्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. कोरोनापासून घाबरण्याची आवश्यकता नाही, मात्र सावधान राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Corona Virus: कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
सावधान राहण्याचं आवाहन...
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळण्याचं आवाहन केलं आहे. किंवा अशा ठिकाणी मास्क घालावे. याशिवाय दोघांमध्ये किमान १.५ मीटरपर्यंत अंतर असावं. नागरिकांनी सतत हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी. कोरोनाची लक्षणं आढळताच तातडीने टेस्ट करण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आला आहे असं आरोग्य तज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे. मात्र तो पहिल्या कोरोना प्रमाणे आक्रमक किंवा घातक नाही असं ही ते म्हणाले. त्यातून जीवित हानी होणार नाही असं ही ते म्हणाले. गेल्या चार वर्षात कोरोना संपला असं जाहीर झाल्यानंतर देखील भारतात एखादा दुसरा रुग्ण सापडत होता. त्यामुळे कोरोना परत येवू शकेल पण त्याची साथ तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसेल असं ही भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.