Indian Railway : भारतीय रेल्वेला राजस्थानमधील एका ग्राहक न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रेन उशीरा धावल्यामुळे एका दाम्पत्याला झालेल्या त्रासाबद्दल न्यायालयाने रेल्वेला ६९,००० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि तुमचे अधिकार काय आहेत, ते जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
राजस्थानातील कोटा येथे राहणारे अनिल राणा आणि त्यांच्या पत्नी अनिता राणा यांनी डिसेंबर २०१७ मध्ये केरळला फिरायला जाण्याचा प्लान केला होता. त्यांनी दिल्लीहून तिरुवनंतपुरमसाठी 'एअर इंडिया'चं विमान बुक केलं होतं. ज्यासाठी त्यांनी ३३,९२९ रुपये खर्च केले होते. कोटा येथून दिल्लीला पोहोचण्यासाठी त्यांनी 'राजधानी एक्सप्रेस'चे तिकीट बुक केलं होतं.
नियोजनानुसार, ही ट्रेन दुपारी १२:४० वाजता दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र ही ट्रेन तब्बल ४ तासांपेक्षा जास्त उशीरा म्हणजेच संध्याकाळी ४:५० वाजता स्टेशनवर पोहोचली. ट्रेन लेट झाल्यामुळे या दाम्पत्याचं विमान चुकलं आणि त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं.
मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड
विमान चुकल्यामुळे या दाम्पत्याला दिल्लीत हॉटेल बुक करून राहावं लागलं. ज्याचा खर्च त्यांना स्वतः करावा लागला. तसेच केरळला जाण्यासाठी त्यांना पुढील विमानाचे तिकीट ७२,९३० रुपये खर्च करून पुन्हा काढावे लागले. या सर्व प्रकारामुळे त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.
ग्राहक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
या त्रासानंतर राणा दाम्पत्याने ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या सुनावणीनंतर ग्राहक मंचाने रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं आणि ऑगस्ट २०२३ मध्ये रेल्वेला एकूण ६९,००० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
अशी होती भरपाईची विभागणी...
विमानाचे नुकसान - ३९,००१ रुपये
मानसिक त्रासासाठी - २०,००० रुपये
हॉटेलचा खर्च - ५,००० रुपये
न्यायालयीन लढाईचा खर्च - ५,००० रुपये
परदेशात काय नियम आहेत?
ट्रेन उशिरा आल्यास अनेक देशांमध्ये प्रवाशांना थेट परतावा मिळतो. उदाहरणार्थ, युरोपीय देशांमध्ये जर ट्रेन ६० मिनिटांपेक्षा जास्त उशिरा आली, तर प्रवाशांना २५% आणि १२० मिनिटांपेक्षा जास्त उशिरा आल्यास ५०% तिकीट परतावा मिळतो. जर तुमचीही ट्रेन रेल्वेच्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे उशिरा आली आणि त्यामुळे तुमचे कनेक्टिंग विमान, बस किंवा इतर मोठे आर्थिक नुकसान झाले, तर तुम्ही देखील ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता. अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना न्याय मिळण्याची आणि नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता दाट असते.