Dharmendra Pradhan resignation letter : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या प्रकरणानंतर कॉकरोच जनता पार्टीसह (सीजेपी), विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. याप्रकरणी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली होती. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा सादर केला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी या राजीनामा देताना एक पत्र लिहिलं आहे. ते संपूर्ण पत्र जसंच्या तसं आम्ही तुम्हाला देत आहोत.
माझ्या तरुण मित्रांनो,
मी गेल्या 4 दशकांपेक्षा अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच सशक्त राष्ट्राचा पाया असते, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
मात्र, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत गैरप्रकार आढळून आला. भारत सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेत ही तपासणी सीबीआयकडे सोपवली. तसेच ही परीक्षा रद्द करून पुनरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) म्हणजेच संगणकावर आधारित मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडणे ही आमची प्रमुख प्राथमिकता होती. यासाठी 'होल ऑफ गव्हर्नमेंट' (Whole of government approach) दृष्टिकोनातून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसह राज्य सरकार आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने 21 जून 2026 रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
पहिल्याच दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मी स्वतः घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही पळ काढला नाही. परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याची संधी हुकणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा माझा ठाम संकल्प होता.
( नक्की वाचा : धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं होतं पेपरफुटीविरोधात आंदोलन, मोडली होती हाडं! जुन्या आंदोलनाची आज जोरदार चर्चा )
16 जुलै रोजी जाहीर झालेला नीट यूजीचा निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले.
परंतु, या संपूर्ण काळात जबाबदार पदांवर बसलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले.
माझा नेहमीच आपल्या लोकशाहीच्या शक्तीवर अढळ विश्वास राहिला आहे आणि मी तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने व अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. तरुण हे केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर नव्या व विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकार आहेत.
गेल्या 10 दिवसांतील घडामोडी पाहून माझे मन दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही.
( नक्की वाचा : JP Nadda: काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेपर फुटले तेव्हा मौन का? जेपी नड्डांचा राहुल गांधींना थेट सवाल )
भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे.
देशाच्या या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे.
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात व करिअर घडवण्यावर केंद्रित करावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.
मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे, मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे भाग्य लाभले, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी नेहमीच समर्पित राहीन.
प्रभू श्री जगन्नाथांच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी स्वतःला समर्पित ठेवेन.
तुमचा
धर्मेंद्र प्रधान