Rahul Gandhi On Maharashtra Elections: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर शंका उपस्थित केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सविस्तर लेख लिहित निवडणूक आयोगाला सवाल केले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवरुन शंका उपस्थित केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणालेत राहुल गांधी?
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त 5 महिन्यांत 8% वाढ झाली. काही बूथवर 20-25% वाढ झाली आहे. बूथ अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याच्याही नोंदी केल्या होत्या. माध्यमांनी केलेल्या पडताळणीत केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांचा पत्ताच नसल्याचे उघड झाले आहे. यावर निवडणूक आयोग गप्प. हे मौन आहे की त्यामध्ये सहभागी आहेत, असा थेच सवाल राहुल गांधींनी केला आहे.
हे काही वेगळे दोष नाहीत. ही मत चोरी आहे. गप्प बसणे, उघड न करणे म्हणजे कबुली आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी हे सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपांवरुन आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचे समोर आले आहे.