Indian Railways ticket hike : भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली. रेल्वेकडून २६ डिसेंबर २०२५ पासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. यातगी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटाचे दर वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे लांबच्या प्रवासासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
सर्वसाधारण श्रेणीमध्ये २१५ किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त भार टाकण्यात आलेला नाही. म्हणजेच या अंतरासाठी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी सर्वसाधारण श्रेणीमध्ये १ पैसा प्रति किलोमीटर आणि मेल/एक्सप्रेसच्या नॉन-एसी आणि एसी क्लाससाठी २ पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होणार आहे. भारतीय रेल्वेने केलेल्या या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. या बदलामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे.
एखादा प्रवासी ५०० किलोमीटरचा प्रवास नॉन-एसी ट्रेनने करत असेल, तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा १० रुपये जास्त द्यावे लागतील. भारतीय रेल्वेने तिकीट दरात केलेली ही या वर्षातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी १ जुलै रोजी रेल्वे भाडे वाढवण्यात आलं होतं.
लोकल प्रवाशांना दिलासा
उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे.