- पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना महिला नेटवर्कद्वारे आपला विस्तार करत आहेत
- या संघटना सुशिक्षित शहरी मुस्लिम महिलांना कट्टरपंथी विचारांकडे आकर्षित केलं जात आहे
- जैशने जमात-उल-मुमिनात या महिला विंगची स्थापना केली असून लश्करने तैयबत नावाच्या विंगद्वारे प्रभाव वाढवित आहे
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लश्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनांनी आता आपला विस्तार करण्यासाठी नवनव्या संकल्पाना अस्तित्वात आणत आहेत. त्यासाठी त्यांनी आता महिला नेटवर्कचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. ISIS, बोको हराम आणि हमासच्या धर्तीवर या संघटना आता महिला आत्मघाती हल्लेखोरांना (Suicide Bombers) प्रशिक्षित करत असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे. विशेषतः सुशिक्षित आणि शहरी मुस्लिम महिलांना कट्टरपंथी विचारधारेकडे आकर्षित करण्यासाठी या संघटना प्रयत्नशील आहेत.
जैशने गेल्या वर्षी 'जमात-उल-मुमिनात' या पहिल्या महिला विंगची स्थापना केली होती. आता लश्कर देखील त्याच मार्गावर असून, 'तैयबत' नावाच्या महिला विंगच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवत आहे. 9 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये झालेल्या एका सभेत जिहादचे उदात्तीकरण करण्यात आले, ज्यामध्ये लश्करच्या अनेक कमांडरच्या पत्नींचाही सहभाग होता. धार्मिक भावनांना हात घालून या महिलांना कट्टरपंथी बनवले जात आहे. त्यांचा वापर पुढे सुसाईट बॉम्बर म्हणून केला जाणार आहे.
एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या मते, "महिलांना कट्टरपंथी बनवणे म्हणजे संपूर्ण कुटुंबात टोकाचे विचार पेरणे होय." महिलांचा वापर रसद पुरवण्यासाठी, विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी केला जात आहे. जैशने 2001 चा संसद हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला घडवून आणला होता. त्यामुळे या नव्या महिला नेटवर्कमुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.या महिला नेटवर्कचे मुख्य काम म्हणजे दहशतवाद्यांना रसद पुरवणे, समाजाशी संपर्क वाढवणे आणि नवीन तरुणांना जिहादसाठी तयार करणे हे आहे.
सुरक्षा विश्लेषक कॅप्टन अनिल गौर (निवृत्त) यांच्या मते, "कट्टरपंथी विचारधारेच्या प्रचारात महिलांचा सहभाग वाढल्याने अशा नेटवर्कचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे." 9 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये झालेली लश्करची सभा हे या वाढत्या धोक्याचे जिवंत उदाहरण आहे. मुंबईवरील 26/11 हल्ला आणि पुलवामा हल्ल्यासारख्या भीषण घटनांमागे या संघटनांचा हात होता. आता महिलांना समोर करून हे गट नवीन प्रकारचे युद्ध तंत्र विकसित करत आहेत. युएनच्या मॉनिटरिंग रिपोर्टने या बदलाची गंभीर दखल घेतली असून, दक्षिण आशियातील सुरक्षा व्यवस्थेसाठी हे एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे.