जाहिरात

JNU Violence: राजधानी हादरली! दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत दगडफेकीचा प्रकार; ABVP चा गंभीर आरोप

JNU Violence: देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) गुरुवारी दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन विद्यार्थी गट एकमेकांशी भिडले.

JNU Violence: राजधानी हादरली! दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत दगडफेकीचा प्रकार; ABVP चा गंभीर आरोप
JNU Violence: हा हल्ला 'सांस्कृतिक आक्रमकता' असल्याचे ABVP ने म्हटले आहे.
मुंबई:

JNU Violence: देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) गुरुवारी दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन विद्यार्थी गट एकमेकांशी भिडले. ABVP शी संबंधित विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली आणि हिंसक हल्ला चढवला. या घटनेमुळे JNU कॅम्पसमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला 'सांस्कृतिक आक्रमकता' असल्याचे ABVP ने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना गुरुवारी (2 ऑक्टोबर ) संध्याकाळी  सुमारे 7:00 वाजता JNU कॅम्पसमधील साबरमती टी-पॉईंटजवळ घडली. ABVP ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, डाव्या विचारांच्या  विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी विसर्जन मिरवणुकीत सामील असलेल्या विद्यार्थ्यांवर चप्पल-जोडे दाखवले, दगडफेक केली आणि अभद्र घोषणाबाजी केली. या घटनेत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सध्या विद्यापीठाचे प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही औपचारिक तक्रार (FIR) दाखल करण्यात आलेली नाही.

( नक्की वाचा : Dussehra 2025: 'रावणाने महिलेचा सन्मान केला, खासदारांनी...?' दसऱ्याच्या दिवशी अभिनेत्रीनं लिहलं वादग्रस्त पत्र )
 

ABVP चे गंभीर आरोप

ABVP शी संबंधित विद्यार्थ्यांनी दावा केला की, हा संपूर्ण गदारोळ जाणूनबुजून घडवून आणला गेला. JNU विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष नीतीश कुमार यांच्या सांगण्यावरून मूर्तीवर दगडफेक करून वातावरण बिघडवल्याचा आरोप ABVP ने केला आहे.

ABVP च्या म्हणण्यानुसार, डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम आधी बराक वसतिगृहाजवळ ठेवला होता, परंतु विसर्जन मिरवणुकीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेवटच्या क्षणी तो टी-पॉईंटवर हलवला. यापूर्वीही या संघटनेच्या विद्यार्थ्यांवर 'महिषासुर'च्या घोषणा देऊन हिंदू सणांचा अपमान केल्याचा आरोप झाला होता.

डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी या पवित्र आयोजनाला हिंसा आणि द्वेषाने कलंकित केले आहे. हा केवळ धार्मिक कार्यक्रमावरचा हल्ला नाही, तर विद्यापीठाच्या उत्सवप्रिय परंपरेवर आणि विद्यार्थ्यांच्या श्रद्धेवर केलेला थेट प्रहार आहे. ABVP अशी सांस्कृतिक आक्रमकता सहन करणार नाही, असा इशारा अभाविप जेएनयूचे अध्यक्ष मयंक पांचाल यांनी दिला. 

नवरात्र उत्सव शांततेत 

विशेष म्हणजे, JNU मध्ये संपूर्ण नवरात्रोत्सव शांततेत पार पडला होता आणि नवमीच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी प्रसाद ग्रहण केला होता. मात्र, विसर्जन मिरवणुकीत झालेल्या या वादामुळे JNU पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com