- करण अदाणी यांनी नेतृत्वशैली घडवण्यासाठी घरातील संस्कार महत्त्वाचे ठरल्याचं सांगितलं
- गौतम अदाणी यांनी नेतृत्वासाठी उपलब्धता आणि जबाबदारीची हाक येते तेव्हा तत्पर राहण्याचे महत्त्व करण यांना शिकवले
- अदाणी कुटुंबात अध्यक्षांच्या व्यस्त वेळापत्रकात नातवंडे आल्यावर सर्व काम थांबवण्याचा नियम आहे असं ते म्हणाले
माझ्या जडणघडणीच्या काळात घरातून मिळालेल्या धड्यांनी माझी नेतृत्वशैली घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे प्रतिपादन अदाणी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्राचे (APSEZ) व्यवस्थापकीय संचालक आणि अदाणी सिमेंटचे संचालक करण अदाणी यांनी केले. 13 मार्च रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या एका नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. नवी दिल्लीतील परिषदेत बोलताना करण अदाणी यांनी गौतम अदाणी आणि डॉ. प्रीती अदाणी यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांचा प्रवास मांडला. रात्री 1 वाजताच्या फोन कॉलचा किस्सा सांगत त्यांनी 'उपलब्धता' हेच नेतृत्वाचे मुख्य लक्षण असल्याचे स्पष्ट केले. तसेच, नातवंडांसोबत वेळ घालवणारे गौतम अदाणी यांचे एक कौटुंबिक रूपही त्यांनी समोर आणले.
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्याकडून आपल्याला लवचिकता, शिस्त आणि सुलभतेचे महत्त्व शिकायला मिळाल्याचे करण अदाणी यांनी सांगितले. त्यांनी एक किस्सा शेअर केला की, एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना रात्री 1 वाजता फोन केला. त्यांनी विचारले की 'तू झोपला आहेस का?' जेव्हा करण यांनी 'हो' म्हटले, तेव्हा गौतम अदाणी म्हणाले की, "नेतृत्व म्हणजे जबाबदारीची हाक येईल तेव्हा उपलब्ध असणे." यावरून नेतृत्वासाठी सतत जागरूक राहणे आणि बांधिलकी असणे किती गरजेचे आहे, हे त्यांना उमजले.
गौतम अदाणी यांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकाविषयी बोलताना करण अदाणी यांनी एक गमतीशीर माहिती दिली. ते म्हणाले की, "अदाणी कुटुंबात अध्यक्षांच्या कामात व्यत्यय आणण्याचा अधिकार फक्त त्यांच्या तीन नातींनाच आहे." कितीही महत्त्वाची बैठक सुरू असली, तरी नातवंडे आल्यावर ती थांबते. यावरून कितीही मोठी जबाबदारी असली, तरी कुटुंबासाठी वेळ असणे महत्त्वाचे आहे, हा संदेश मिळतो असं ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
करण अदाणी यांच्यावर त्यांच्या आईचा, डॉ. प्रीती अदानी यांचाही मोठा प्रभाव आहे. अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्यासाठी त्या करत असलेल्या कामामुळे करण यांना व्यवसायापलीकडे सामाजिक जाणिवेचे महत्त्व समजले. "आईच्या कामामुळे मला हे समजले की, प्रगतीचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे," असे ते म्हणाले. करण अदाणी यांनी आपल्या वडिलांच्या शिस्तीचे आणि आईच्या मायेचे कौतुक केले. उद्योग विस्तारताना सामाजिक भान कसे जपावे, हे आईकडून शिकल्याचे त्यांनी सांगितले. "व्यवसाय मालमत्ता निर्माण करतो, पण संस्कार संस्था (Institutions) घडवतात," अशा शब्दांत त्यांनी अदाणी समूहाच्या वाटचालीचे सार सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world