- A 30-year-old LIC officer collapsed and died while playing cricket in Jhansi
- Ravindra Ahirwar felt unwell, vomited, and lost consciousness during the game
- He was taken to Maharani Laxmi Bai Medical College and declared dead on arrival
उत्तर प्रदेशातील झाशी शहरात बुधवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) विकास अधिकारी असलेले रवींद्र अहिरवार (वय 30) यांचा क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळून मृत्यू झाला. या घटनेमुळे क्रिकेटच्या मैदानावर आणि त्यांच्या परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
झाशीच्या सिप्री बाजार परिसरातील नलगांज येथील रहिवासी असलेले रवींद्र अहिरवार हे बुधवारी सकाळी शासकीय इंटर कॉलेज (GIC) मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. बऱ्याच आठवड्यांनंतर ते आज खेळण्यासाठी आले होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र अहिरवार गोलंदाजी करत होते. काही षटके टाकून झाल्यावर त्यांनी पाणी पिण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घेतला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. काही क्षणातच ते मैदानात अचानक कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांचे सहकारी घाबरले. त्यांना सुरुवातीला डिहायड्रेशन झाल्याचे वाटले. पण रवींद्र अहिरवार यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.
(नक्की वाचा- Jemimah Rodrigues: जेमिमाह रॉड्रिग्सने वांद्रे सोडून नवी मुंबईत घेतलं नवीन घर, कारण वाचून अभिमान वाटेल!)
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
रवींद्र यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
रवींद्र अहिरवार यांचा लहान भाऊ अरविंद अहिरवार यांनी NDTV ला सांगितले की, "आज सकाळी तो खूप आनंदी होता आणि त्याची तब्येत चांगली होती. बऱ्याच दिवसांनी तो लवकर उठला आणि वडिलांसोबत चहा घेतला. वडिलांचा निरोप घेऊन तो क्रिकेट खेळायला गेला. तो गेल्यानंतर सुमारे एक तासाने त्याची तब्येत बिघडल्याचे आम्हाला कळाले."
मृत्यूचे कारण काय?
महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन माहौर यांनी सांगितले की, प्राथमिक लक्षणांनुसार रवींद्र अहिरवार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होण्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.