Love In Jail: गुन्हेगाराला सुधारण्यासाठी जेल असते असं आपण ऐकलंय, पण याच जेलच्या भिंतींच्या आड एक अशी प्रेमकहाणी फुलली जिची चर्चा आता संपूर्ण देशात होत आहे. एका बाजूला कायद्याचे रक्षण करणारी खाकी वर्दीतील अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी. या दोघांमधील प्रेमाचा प्रवास इतका नाट्यमय आहे की एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल. समाजाचे नियम आणि धर्माच्या भिंती ओलांडून या दोघांनी अखेर लग्नाची गाठ बांधली आहे.
प्रेमाची ही अनोखी गोष्ट मध्य प्रदेशातील आहे. सतना येथील मध्यवर्ती कारागृहात सहायक जेल अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या फिरोजा खातून आणि माजी कैदी धर्मेंद्र सिंह यांनी 5 मे रोजी विवाह केला. छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथे हा विवाह सोहळा हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. मुस्लिम कुटुंबातील फिरोजा यांच्या या निर्णयामुळे त्यांचे नातेवाईक नाराज होते, त्यामुळे ते लग्नाला आले नाहीत. अशा वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत फिरोजा यांचे कन्यादान केले आणि सर्व विधी पार पाडले.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
जेलमधील ड्युटी आणि मैत्रीचा प्रवास
फिरोजा खातून या जेलमध्ये वारंट शाखेची जबाबदारी सांभाळत होत्या. याच काळात धर्मेंद्र सिंह तिथे हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. धर्मेंद्र हा वारंट संबंधी कामात जेल प्रशासनाला मदत करायचा, त्यामुळे फिरोजा यांच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले.

विशेष म्हणजे 2007 मध्ये चंदला नगर परिषदेच्या उपाध्यक्षांची हत्या केल्याप्रकरणी धर्मेंद्रला शिक्षा झाली होती. मात्र, जेलमधील 14 वर्षांच्या काळात त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळेच प्रशासनाने 2022 मध्ये त्याची वेळेआधी सुटका केली.
( नक्की वाचा : KDMC News: 'स्वतःच्या बुडाखालचा अंधार पाहा, किती लफडी...'; केडीएमसीत शिवसेना नेत्यांमध्येच ठिणगी! प्रकरण काय? )
सुटकेनंतर प्रेम फुलले
धर्मेंद्रची जेलमधून सुटका झाल्यानंतर ही प्रेमकहाणी संपेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, तसं झालं नाही. जेलबाहेर आल्यावरही फिरोजा आणि धर्मेंद्र फोनच्या माध्यमातून संपर्कात होते. तासनतास चालणाऱ्या संवादाने त्यांचे नाते अधिक घट्ट केले. शेवटी दोघांनीही आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. फिरोजा यांनी आपल्या पदाचा किंवा धर्माचा विचार न करता आपल्या प्रेमाला प्राधान्य दिले आणि लग्नाचा धाडसी निर्णय घेतला.
बजरंग दलाने निभावले कन्यादानाचे कर्तव्य
या लग्नाला फिरोजा यांच्या कुटुंभाचा विरोध असल्याने लग्नमंडपात वधू पक्षाकडून कोणीही नव्हते. अशा परिस्थितीत सामाजिक सलोख्याचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. लग्नासाठी पोहोचलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिरोजा यांचे भाऊ आणि वडील बनून कन्यादान केले. वैदिक मंत्रोच्चारांच्या घोषात हा विवाह सोहळा संपन्न झाला. सध्या सातना आणि छतरपूर परिसरात या लग्नाची आणि फिरोजा यांच्या हिंमतीची मोठी चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world