- अजमेरमध्ये एका हिंदू तरुणीने मुस्लीम तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक तणाव निर्माण झाला आहे
- तानिया यादव आणि समीर दमामी यांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे लिव्ह-इन रिलेशनशिप कार्ड तयार केले
- तानिया यादव घरातून न सांगता निघून गेली असून तिला परत येण्यासाठी नातेवाईकांनी विनवणी केल्या
प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या एका तरुणीच्या विधानाने सध्या अजमेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. "मर जाऊंगी मगर समीर के साथ रहूंगी" असं म्हणत एका हिंदू तरुणीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुजानगडच्या समीर दमामी नावाच्या तरुणासोबत तिचे सूत जुळले असून, ती आता कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. राजस्थानमधील अजमेर शहरात एका सज्ञान हिंदू तरुणीने मुस्लीम तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
बाबूगड परिसरात तानिया यादव ही तरुणी राहते. 2 फेब्रुवारीपासून ती घरातून बेपत्ता होती. ती सुजानगड येथील समीर दमामी नावाच्या तरुणासोबत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. नातेवाईकांनी सांगितले की या दोघांनी 45,000 रुपये खर्च करून 'लिव्ह-इन रिलेशनशिप' संदर्भातील एक कायदेशीर कार्ड तयार करून घेतले आहे. हे दस्तऐवज न्यायालयीन प्रक्रियेद्वारे बनवल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी, पोलीस या कागदपत्रांची अधिकृतता तपासत आहेत.
तरुणीने "मी स्वतःच्या मर्जीने समीरसोबत राहणार, वाटल्यास जीव देईन पण त्याला सोडणार नाही," असा पवित्रा घेतल्याने प्रशासन आणि कुटुंबासमोर पेच निर्माण झाला आहे. या घटनेनंतर गंज पोलीस ठाण्याबाहेर हिंदू संघटना आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तरुणीचे समुपदेशन (Counseling) करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम आहे. पोलीस सध्या तरुणीच्या वयाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रेमी युगुलाने चक्क 45,000 रुपये खर्च करून एक लिव्ह-इन कार्ड बनवून घेतले आहे. 2 फेब्रुवारी रोजी घरातून न सांगता निघून गेलेल्या तानियाचा शोध लागल्यावर नातेवाईकांनी तिला घरी परतण्यासाठी खूप विनवण्या केल्या, पण तिने स्पष्ट नकार दिला. गंज पोलिस स्टेशनच्या बाहेर बुधवारी रात्री नातेवाईकांनी आणि काही संघटनांनी ठिय्या मांडला होता. तरुणीला फूस लावून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर दुसरीकडे, तरुणीने आपण सज्ञान असून स्वतःचा निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या प्रेमप्रकरणामुळे सध्या अजमेरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.