Crime News: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन युवकांनी मिळून एका दलित तरुणाला मारहाण करून जबरदस्तीने लघवी पाजल्याचा आरोप आहे. आरोपींनी या तरुणाला ग्वाल्हेरमधून अपहरण करून भिंड जिल्ह्यातील सुरपुरा येथे नेले होते. अमानुष कृत्य केल्यानंतर ते त्याला तिथेच सोडून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार रात्रीची आहे. पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी तो दतावली गावातील सोनू बरुआची बोलेरो गाडी चालवत होता. पण नंतर त्याने ते काम सोडले. त्यानंतर तो ग्वाल्हेरमध्ये आपल्या सासरवाडीत येऊन राहू लागला होता.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
नेमकं काय घडलं?
पीडित व्यक्तीने सांगितलं की, सोमवारी सोनू बरुआ आपल्या दोन साथीदार आलोक पाठक आणि छोटे ओझा यांच्यासोबत दीनदयाल नगर येथील त्याच्या सासरवाडीत पोहोचले. तिघांनी त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले आणि नंतर भिंड जिल्ह्यातील सुरपुरा गावात घेऊन आले. तिथे तिघांनी त्याला मारहाण केली आणि जबरदस्तीने लघवी पाजली. या दरम्यान त्याची तब्येत बिघडू लागल्याने ते त्याला तिथेच सोडून पळून गेले. त्याने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळाने कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या, पाहा नवीन वेळापत्रक)
दोन आरोपी ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तीचे भेट घेत संपूर्ण माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर बंधक बनवणे, मारहाण करणे आणि लघवी पाजल्याचा आरोप केला आहे. आरोपी सोनू बरुआ आणि आलोक पाठक यांना ताब्यात घेण्यात आले असून, एका अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.