Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं

'ऑयल इंडिया लिमिटेड'ने जैसलमेरच्या वाघेवाला क्षेत्रात कच्च्या तेलाच्या उत्पादनात 70 टक्क्यांची वाढ नोंदवली असून, दररोज 1202 बॅरल उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलाचा तुटवडा निर्माण झाला असताना भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. राजस्थानच्या थार वाळवंटातील वाघेवाला तेल क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी 'ऑयल इंडिया लिमिटेड'ने (OIL) 705 बॅरलवरून थेट 1202 बॅरल प्रति दिन कच्च्या तेलाचे उत्पादन घेण्याचा पराक्रम केला आहे.

उत्पादनाचा 70% 'फॉर्म्युला' काय?

वाघेवाला क्षेत्रातील कच्चे तेल अत्यंत घट्ट असल्याने पारंपरिक पद्धतीने ते काढणे कठीण होते. मात्र, ऑईल इंडियाने अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हा अडथळा दूर केला. 'सायक्लिक स्टीम स्टिमुलेशन' (CSS) या थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करून घट्ट तेल पातळ करून बाहेर काढले जात आहे.

Advertisement

देशात पहिल्यांदाच 'फिशबोन ड्रिलिंग' आणि 'बेअरफुट कंप्लीशन' यांसारख्या आधुनिक ड्रिलिंग पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 'डायल्यूएंट इंजेक्शन' आणि 'आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टम'मुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

(नक्की वाचा-  Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)

जैसलमेर ते गुजरात, असा आहे तेलाचा प्रवास

जैसलमेरच्या वाळवंटातून निघालेले तेल थेट रिफायनरीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष साखळी कार्यरत आहे. वाघेवाला (राजस्थान) येथून टँकर्सद्वारे कच्चे तेल गुजरातला पाठवले जाते. मेहसाणा (गुजरात) येथील ओएनजीसीच्या (ONGC) केंद्रावर हे तेल जमा केले जाते. वडोदरा (गुजरात) पाइपलाइनद्वारे हे तेल इंडियन ऑईलच्या (IOCL) कोयाली रिफाइनरीमध्ये** शुद्धीकरणासाठी पाठवले जाते.

52 विहिरींपैकी 33 कार्यरत

राजस्थान बेसिनच्या बिकानेर-नागौर उप-बेसिनमध्ये 1991 मध्ये या तेल क्षेत्राचा शोध लागला होता. सध्या येथे एकूण 52 विहिरी असून, त्यापैकी 33 प्रत्यक्ष कार्यरत आहेत. या वर्षात 13 नवीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत, तर 19 विहिरींमध्ये CSS ऑपरेशन पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 45,773 मेट्रिक टन वार्षिक उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी 32,787 मेट्रिक टन इतके होते.

(नक्की वाचा-  Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा)

थार वाळवंटातील आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत मिळवलेले हे यश भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होईल," असे ऑईल इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Advertisement
Topics mentioned in this article