राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधून आलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना हल्ल्यापूर्वी पूर्वनियोजित पद्धतीने आश्रय दिला गेला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. शिवाय धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर हे सर्व दहशतवादी फरार झाले होते. त्यांचा अजूनही शोध घेतला जात आहे. मात्र त्यांना सहारा देणारे पकडले गेले आहेत. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अटक करण्यात आलेल्यांची नावे परवेझ अहमद जोठर (बाटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोठर (हिल पार्क, पहलगाम) अशी आहेत. या दोघांनी तीन दहशतवाद्यांना हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या परिसरात एका तात्पुरत्या झोपडीत थांबवले होते. शिवाय त्यांना खायला दिले होते. त्याच बरोबर आवश्यक वस्तू ही पुरवल्या होत्या. असं एनआयएच्या चौकशीत समोर आले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. परंतु 26 निष्पाप पर्यटकांची हत्या करणारे चार दहशतवादी अद्याप सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत.
ट्रेंडिंग बातमी - Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला
या हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. भारताने प्रत्युत्तरादाखल 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी ठिकाणे नष्ट केली. तरीही, मुख्य गुन्हेगारांना अटक होण्यास विलंब झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरक्षा दले कोणत्या आव्हानांना तोंड देत आहेत आणि या हल्ल्यानंतर आतापर्यंत काय झाले, ते जाणून घेऊया.
पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम
22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी धर्म विचारून हिंदूं पर्यटकांना लक्ष्य केले होते. त्यात 26 लोक मारले गेले. 17 जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) ने स्वीकारली. भारताने त्वरित याला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद म्हटले होते. 23 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाची यात्रा अर्धवट सोडून दिल्लीत सुरक्षा आढावा बैठक घेतली. कॅबिनेट सुरक्षा समिती (CCS) ने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथे सांगितले की हल्लेखोरांना "कल्पनेपलीकडची शिक्षा" दिली जाईल.
ऑपरेशन सिंदूर: भारताचे प्रत्युत्तर
7 मे 2025 रोजी भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. या मोहिमेत राफेल, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि S-400 संरक्षण प्रणालीचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 9 दहशतवादी ठिकाणांना नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. ज्यात मुदस्सर खार, हाफिज जमील आणि युसूफ अजहर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.
दरम्यान या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना अटकेला विलंब होण्याची कारणे ही समोर आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)27 एप्रिल रोजी या प्रकरणाची चौकशी हाती घेतली. परंतु दोन महिन्यांनंतरही चार मुख्य दहशतवादी फरार आहेत. पहलगामचा डोंगराळ प्रदेश आणि घनदाट जंगले दहशतवाद्यांना लपण्यासाठी अनुकूल आहेत. गुप्तचर माहितीच्या कमतरतेमुळेही हल्लेखोर अजूनही वाचत आहेत. हल्लेखोर पीओकेमध्ये लपलेले असू शकतात, जिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या संमतीने संरक्षण मिळत आहे असे मानले जाते.लष्कर आणि TRF चे स्थानिक समर्थन आणि स्लीपर सेल नेटवर्क तपासणीला गुंतागुंतीचे बनवत आहेत. 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओच्या चर्चेनंतर युद्धविराम झाला, परंतु दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. 8 मे रोजी बीएसएफने पीओकेमध्ये एक दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले.