Panipuri Death Case: भीषण उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. तेलकट-मसालेदार आणि दूषित अन्नपदार्थामुळे लोक आजारी पडत आहेत. याचसंदर्भातील एक धक्कादायक घटना समोर आलीय, ती म्हणजे दूषित पाणीपुरी आणि छोले खाऊन एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य 18 लहान मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. हा गंभीर प्रकार झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील आहे. मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजटो गावात पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर 20 ते 25 जणांना विषबाधा झाला.
18 मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
रविवार (26 एप्रिल) संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या अचानक वाढली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 6 वर्षीय रंजन कुमारची प्रकृती खालावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पाणीपुरीतून विषबाधा झाल्यानं रुग्णालयात 18 मुलांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
फेरीवाल्याकडील पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने विषबाधा
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एक फेरीवाला बजटो गावात पाणीपुरी आणि छोले विकण्यासाठी पोहोचला होता. गावातील लहान मुलं आणि महिलांनी त्याच्याकडील पाणीपुरी-छोलेचा आस्वाद घेतला. काही तासांनंतरच लोकांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. रविवारपर्यंत स्थिती अधिक गंभीर झाली आणि लोक आजारी पडू लागले.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. डॉक्टरांचे एक पथक रुग्णांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
Photo Credit: NDTV Marathi
SDM आणि SDPO यांनी केली पाहणी
रुग्णांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी (25 एप्रिल) संध्याकाळी एका फेरीवाल्याकडील पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर घरातील सर्वजण आजारी पडले. गावकऱ्यांच्या मते अन्न दूषित झाल्यामुळे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त रामनिवास यादव, एसडीएम श्रीकांत यशवंत आणि एसडीपीओ जितवाहन उराव यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने त्या फेरीवाल्याचा शोध सुरू केला आहे. संशयित खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून घटनेचे कारण निश्चित करण्यासाठी तपास करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत.