झारखंडमध्ये उत्पादन शुल्क विभागातील कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेदरम्यान 12 तरुणांचा मृत्यू झाला आहे. उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलच्या 583 पदांसाठी ही भरती होती. यासाठी राज्यातील पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि उच्च पदवी असलेले इतर तरुणही सामील होते. तर यासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शारीरिक चाचणीचा भाग म्हणून 22 ऑगस्टपासून विविध जिल्ह्यांमध्ये धावण्याची स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांना 10 किलोमीटरची शर्यत एका तासात आणि महिला उमेदवारांना 40 मिनिटांत पाच किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्याची अट आहे. गेल्या 11 दिवसांत ही खडतर शर्यत पूर्ण करताना 300 हून अधिक उमेदवार बेशुद्ध झाले आहेत, तर 12 तरुणांचा मृत्यू झाला आहे.
विविध ठिकाणी निदर्शने
गेल्या तीन दिवसांपासून रांची, हजारीबाग, देवघर आणि गिरिडीह जिल्ह्यात या घटनांबाबत निदर्शने झाली. शर्यतीदरम्यान पलामूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. पद्मा, हजारीबाग येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शर्यतीत आतापर्यंत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गिरिडीह, पूर्व सिंगभूम, गिरिडीह, रांची आणि साहिबगंज येथे प्रत्येकी एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.
(नक्की वाचा - IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)
गुन्हा दाखल, तपास सुरु
झारखंड पोलीस महासंचालकांनी याबाबत सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा तपास सुरू केला आहे. सर्व केंद्रांवर वैद्यकीय पथके तैनात आहेत. मृत्यू झालेल्या तरुणांपैकी काहींनी औषध प्राशन केल्याचे समोर आले आहे.
(नक्की वाचा - VIDEO : घाणेरडी शेरेबाजी करणं तरुणाला महागात पडलं, विद्यार्थिनीने सळो की पळो केलं)
डॉक्टरांनी काय सांगितलं?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तरुणांच्या सतत होणाऱ्या मृत्यूंबाबत रांची रिम्सचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अंशुल कुमार यांनी सांगितलं की, नियमित व्यायाम न करणाऱ्या तरुणांनी अचानक 10 किलोमीटरच्या शर्यतीत भाग घेऊ नये. तरुणांनी आरोग्य तपासणी केल्याशिवाय लांबच्या शर्यतींमध्ये भाग घेऊ नये. जर तुम्हाला हृदय आणि फुफ्फुसाचा आजार असेल तर लांब धावल्याने मृत्यू होऊ शकतो.