PM Modi Rajya Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर बोफोर्स घोटाळ्यावरून सडकून टीका केली आहे. सध्या सुरू असलेल्या अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच्या व्यापारी करारांवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या टीकेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसच्याच काळातील जुन्या जखमांवर बोट ठेवले आहे.
काँग्रेसच्या काळात कराराचा अर्थ फक्त घोटाळे
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात जेव्हा जेव्हा कोणत्याही कराराची चर्चा व्हायची, तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळेच यायचे. त्यांच्यासाठी कराराचा अर्थ हा केवळ बोफोर्ससारखे व्यवहार असा होता.
आजही लोक या पक्षांबद्दल बोलताना विकासाच्या मुद्द्यांऐवजी त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचीच आठवण काढतात, असा टोला मोदींनी लगावला.
( नक्की वाचा : महिला खासदारांनी घातला होता पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, PM मोदींच्या भाषणापूर्वी काय घडलं? वाचा Inside Story )
विरोधकांचा गोंधळ आणि खर्गेंना टोला
पंतप्रधान बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. यादरम्यान मोदींनी मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून एक खोचक टिप्पणी केली.
खर्गे यांचे वय 83 वर्ष असल्याने त्यांनी बसूनच घोषणाबाजी करावी, असा चिमटा मोदींनी काढला. या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विरोधक बाहेर गेल्यानंतर मोदी म्हणाले की, ते थकले असून आता मैदानातून पळून गेले आहेत.
2014 पूर्वीच्या गोंधळाची सफाई
काँग्रेसने 2014 सालापूर्वी देशाची अवस्था अत्यंत दयनीय करून ठेवली होती आणि आपल्या सरकारला ती सुधारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, असे मोदींनी सांगितले. जगामध्ये भारताची जी एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती, ती बदलण्यासाठी आपल्याला बराच काळ खर्च करावा लागला. तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि डीएमके यांसारख्या पक्षांनी अनेक वर्षे सत्ता भोगली, परंतु त्यांची ओळख केवळ भ्रष्टाचारामुळेच निर्माण झाली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )
अमेरिका करारावर काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर
केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नव्या करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि भारत अमेरिकेच्या दबावाखाली झुकला आहे, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात होता. यावर प्रत्युत्तर देताना मोदींनी बोफोर्सचे उदाहरण देऊन काँग्रेसच्या धोरणांवर हल्ला चढवला. सरकारने स्पष्ट केले आहे की, या नव्या करारामध्ये शेती आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या हिताला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.