Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या हल्ल्यानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहमंत्र्यांना श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदींनी X वर या हल्ल्याच्या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, 'जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलंय, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. पीडित व्यक्तींना शक्य असेल ती सर्व मदत दिली जात आहे. या घृणास्पद हल्ल्याच्यामागे जे आहेत, त्यांना न्यायालयाच्या कठड्यात आणले जाईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कायम आहे आणि तो आणखी मजबूत होईल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी निर्देश दिल्यानंतर शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी बैठक बोलावली. या उच्चस्तरीय बैठकीत गृह सचिव आणि आयबी प्रमुखांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.