- मध्य प्रदेशातील व्यावसायिक राजा रघुवंशी यांची मे २०२५ मध्ये मेघालयात निर्घृण हत्या झाली होती
- राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने होलिका दहनात सोनमने लग्नात नेसलेली साडी जाळण्याचा निर्णय घेतला आहे
- राजाच्या आईने सांगितले की होळीच्या दिवशी सोनमने राजाला रंग खेळायला बोलावले पण त्यामागे हत्या करण्याचा कट होता
Sonam Raghuvanshi Saree Holika Dahan: सत्य आणि असत्याच्या लढाईत 'होलिका दहन' हे नेहमीच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या कुटुंबासाठी यंदाची होळी सूड आणि दुःखाची प्रतीक बनली आहे. राजाची पत्नी आणि त्याच्या हत्येतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिने लग्नाच्या फेऱ्यांवेळी नेसलेली साडी यावर्षी होलिका दहनात जाळण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे. तिने माझ्या मुलाशी रक्ताची होळी खेळली असा टोहा या वेळी राजाच्या आईने फोडला.
मे 2025 मध्ये मेघालयात हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पत्नी सोनमसह पाच जण सध्या तुरुंगात आहेत. "सोनम तुरुंगात आहे, तिला आम्ही जाळू शकत नाही, पण तिच्या आठवणी आणि त्या रक्ताळलेल्या नात्याची निशाणी असलेली साडी आम्ही अग्नीला अर्पण करणार आहोत," अशी संतप्त भावना राजाच्या आईने व्यक्त केली आहे. एक प्रकारे त्यांनी आपला राग ही या निमित्ताने व्यक्त केला. काही कारण नसताना राजाचा या संपूर्ण प्रकरणात बळी गेला होता.
गेल्या वर्षीच्या होळीचा एक व्हिडिओ पाहताना राजाच्या आईला अश्रू अनावर झाले. गेल्या वर्षी सोनमनेच राजाला रंग खेळायला बोलावले होते. मात्र त्या गुलालाच्या मागे हत्येचा कट शिजत होता, असा आरोप कुटुंबाने केला आहे. "ज्या गुलालाने तिने राजाला भुरळ घातली, त्याच गुलालाचा बदला घेण्यासाठी तिने यावर्षी माझ्या मुलाशी रक्ताची होळी खेळली," असे म्हणत आईने आता आयुष्यात कधीही सण साजरे न करण्याचा निर्धार केला आहे.
राजाच्या आईने सोनमने लग्नात नेसलेली साडी जाळण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मते, ही केवळ साडी नसून त्यांच्या घराचा आनंद हिरावून घेणाऱ्या वेदनेची ती निशाणी आहे. "गेल्या होळीला दोघे एकत्र गुलाल खेळत होते, तेव्हा सर्व काही ठीक वाटत होते. पण सोनमच्या मनात कपट होते. तिने माझ्या मुलाचा विश्वासघात केला," असे सांगताना आईचा आवाज दाटून आला. आता या घरात कधीही होळी किंवा दिवाळी साजरी होणार नाही, कारण त्यांचा 'राजा' कायमचा निघून गेला आहे असं ही त्या म्हणाल्या.
मे 2025 मध्ये राजा रघुवंशी पत्नी सोनमसोबत मेघालयाला फिरायला गेले होते. तिथेच त्यांची हत्या झाली. या प्रकरणात सोनम, तिचा मित्र राज कुशवाहा आणि इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून, कुटुंबाने या प्रतीकात्मक दहनातून न्यायाची मागणी केली आहे. सुरूवातीला सोनम आणि राजा हे दोघे ही बेपत्ता होते. त्यामुळे ही बातमी संपूर्ण देशभरात पसरली होती. पण ज्यावेळी सत्य समोर आले त्यावेळी सर्वच जण हैराण झाले होते.