- देशवासीय भीषण उष्माघाताचा सामना करत आहेत आणि लवकरच अल निनोच्या परिणाम दिसण्याची शक्यता आहे
- सुपर अल निनोमुळे भीषण परिस्थिती निर्माण होणार?
- भारतासह अनेक देशांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता
Super El Nino 2026: महाराष्ट्रासह देशभरात सध्या भीषण उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत. मे महिन्याची सुरुवात काही ठिकाणी पावसाने झाली असली तरी दिवसा कडाक्याच्या उन्हामुळे तापमान सतत वाढत आहे. एप्रिल महिन्यातही उष्णतेने अनेक विक्रम मोडीत काढले असून हवामान विभागाकडून सातत्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जात आहे. असे चित्र केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलाचे मुख्य कारण म्हणजे 'सुपर अल निनो' आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस अल निनोचा एक अतिशय शक्तिशाली पॅटर्न तयार होऊ शकतो, जो गेल्या तीन दशकांतील सर्वात वाईट अल निनोचे परिणाम तयार होण्याची शक्यता आहे.
जगभरात सुपर अल निनोचा अलर्ट | Super Al Nino Alert
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या मते, मे महिना ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता सुमारे 60 टक्के आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेने देखील अलीकडेच म्हटलंय की, अल निनोची स्थिती मे महिना ते जुलै महिना या कालावधी दरम्यान कधीही निर्माण होऊ शकते. जागतिक हवामान संस्थेने (WMO) सांगितलंय की, सुरुवातीच्या दिवसाचे संकेत दर्शवतात की ही घटना खूप शक्तिशाली असू शकते आणि काही लोक याला 'सुपर अल निनो' देखील म्हणत आहेत. या हवामान पद्धतीचा सर्वाधिक परिणाम भारत यासारख्या आशियाई देशांवर होईल.
काय आहे सुपर अल निनो?
सुपर अल निनो हे अल निनोचे एक अतिशय शक्तिशाली रूप आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा 2 अंश डिग्री किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा ही स्थिती निर्माण होते. ही एक दुर्मीळ हवामान घटना आहे जी जगभरातील हवामानात विनाशकारी बदल घडवून आणते. अशी स्थिती अनेक दशकांतून एकदाच पाहायला मिळते. यावर्षी ज्या सुपर अल निनोची शक्यता वर्तवली जात आहे, ती स्थिती सुमारे 30 वर्षांनंतर पुन्हा येईल. या काळात समुद्रावरील वारे कमकुवत होतात किंवा आपली दिशा बदलतात, ज्यामुळे गरम पाणी संपूर्ण प्रशांत क्षेत्रात पसरते. 1982-83, 1997-98 आणि 2015-16 मध्ये सुपर अल निनोच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. शास्त्रज्ञांनी वर्ष 2026 मध्येही ही स्थिती येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. भारतात यामुळे मान्सून कमकुवत होतो, परिणामी पाऊस कमी पडतो आणि भीषण दुष्काळाची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर होऊन महागाई वाढू शकते.
(नक्की वाचा : Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, घराबाहेर पडावं की पडू नये? दुर्लक्ष करू नका वाचा माहिती)
भारतावर काय परिणाम होईल?
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मे महिन्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले काही भाग, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात सामान्यपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असेही सांगितलंय की, मे महिन्यादरम्यान देशात सरासरी पर्जन्यमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते, कारण अंदमान आणि निकोबार बेटांवर नैऋत्य मान्सूनचे आगमन 14-16 मेच्या सुमारास होण्याची अपेक्षा आहे.
Photo Credit: NDTV Marathi
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की,'मे 2026 दरम्यान देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.' उत्तर-पश्चिम भारताच्या अनेक क्षेत्रांसह मध्य भारत, द्वीपकल्पीय भारताचे काही भाग आणि ईशान्य भारताच्या दक्षिण भागात किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.