अनुज रायाते, प्रतिनिधी
Surat Flood : गेल्या दोन दिवसांपासून सुरत शहरात पावसाची (Heavy rains in Surat) कोसळधार सुरू आहे. यामुळे शहरातील अनेक भाग, विशेषतः खाडीच्या आसपासचे भाग, अद्यापही पाण्याखाली आहेत. सुरत महानगरपालिका (एसएमसी) आपण पूर्णपणे तयार होतो असा दावा करत असली, तरी अवघ्या ४८ तासांत आलेल्या या प्रचंड पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.
रस्त्यावरचं पाणी आणि नागरिकांची कसरत
रिशी नगर परिसरात लोकांना चिखलातून वाट काढावी लागली. याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये कोणी सायकलवरून, तर कोणी दुचाकी ढकलताना दिसत आहेत. रिक्षाचालकांकडूनही याचा फायदा घेत नेहमीपेक्षा दुप्पट भाडे आकारले जात आहे. “ही तर आता दरवर्षीची गोष्ट झालीये,” प्रवीण नावाच्या स्थानिक रहिवाशाने नाराजी व्यक्त केली. “दरवर्षी हेच होतं, पण काहीच उपाय होत नाही.” “बाहेर पडायला निघालं की खर्च वाढतो. गाड्या बंद पडतात, रिक्षावाले दुप्पट भाडे मागतात, मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. सगळं अवघड होऊन बसतं,” असं एका रिक्षात बसलेल्या रहिवाशाने सांगितले.
"इच्छाशक्तीचा अभाव"
जुन्या रहिवाशांपैकी एक अशोक रावल यांनी या समस्येचं मूळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावात असल्याचं सांगितलं. “हा प्रकार गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. महानगरपालिकेचं बजेट 8,500 कोटींच्या घरात आहे. पण पावसाळ्याची कोणतीही ठोस धोरणं नाहीत, नियम नाहीत. आम्ही याबाबत नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांच्याकडे तक्रारी केल्या, पण कुणीच ऐकत नाही,” असं त्यांनी नाराजीने सांगितलं.
महानगरपालिकेचं भौगोलिक कारण
या टीकेला उत्तर देताना सुरत महानगरपालिकेच्या आयुक्त शालिनी अग्रवाल यांनी सांगितलं, ही परिस्थिती अपवादात्मक आहे. “दहा तासांत दहा इंच पाऊस पडला, ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खाडीच्या जवळचं आहे. आमच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि अग्निशमन विभागाच्या सर्व टीम कार्यरत होत्या. त्याच संध्याकाळी बहुतांश रस्ते मोकळे करण्यात आले. पण सुरतच्या भौगोलिक ठिकाणामुळे ही समस्या गुंतागुंतीची ठरते. आजूबाजूच्या भागातून येणारं पाणी शहरात येतं आणि भरतीच्या वेळी खाडीतून पाणी परत बाहेर ढकललं जातं.” त्या पुढे म्हणाल्या, ज्या भागात पाणी साचलं आहे, तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. शहरात स्वच्छता मोहीम आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य तपासणी मोहिमाही सुरू करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Uttarakhand Bus Accident : बस नदीत कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 बेपत्ता
दक्षिण-पश्चिम झोनमधील पुनरावृत्ती
दक्षिण-पश्चिम झोनमधील मिठी खाडी परिसरात पाणी साचण्याची समस्या सर्वाधिक तीव्र आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग अशा पूरस्थितीला तोंड देत आहे. एसएमसीचे उपायुक्त धर्मेश मिस्त्री यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं, “हा खालचा भाग आहे. खाडी केवळ सुरतचंच पाणी वाहून नेत नाही, तर आजूबाजूच्या गावांमधून येणारं पाणीही यात मिसळतं. भरतीच्या वेळी पाणी कधी कधी रहिवाशी भागात येतं.” मिस्त्री यांनी ही समस्या गुंतागुंतीची असल्याचं मान्य केलं. पण तांत्रिक उपाययोजनांचा विचार सुरू असल्याचं आश्वासन दिलं. “आम्ही पावसाचं पाणी गंभीर ठिकाणांपर्यंत पोहोचण्याआधी वळवण्याचे मार्ग शोधत आहोत. यात तांत्रिक अडचणी आहेत, पण मंजुरी मिळाल्यावर आम्ही त्या अंमलात आणू,” असं त्यांनी सांगितलं. आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतही त्यांनी दावा केला की, “आमच्या टीम्स सर्वोत्तम सुसज्ज आहेत. आम्ही प्रत्येक प्रभावित व्यक्तीला वाचवलं आणि शाळांसारख्या सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलं.”
विस्थापितांचा आक्रोश
मात्र, पूरग्रस्त कुटुंबांना एका उर्दू शाळेत हलवण्यात आलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या दाव्यांशी वास्तवाचा काहीही संबंध नाही. “रात्री पाणी आलं. पायाला जाणवलं आणि आम्हाला पळावं लागलं. आम्ही सात जणांचं कुटुंब आहे,” सुमनबेन नावाच्या विस्थापित महिलेने सांगितलं. “दरवर्षी हेच होतं. पावसाळ्यात आजारी पडतो, कपडे खराब होतात, काम नाही, पैसे नाहीत.” इतरांनीही प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले. “आम्हाला बांधकाम करू देत नाहीत आणि स्वतःही काही करत नाहीत,” अशी तक्रार एका वृद्ध महिलेने वर्गात बसून केली. रिमा नावाच्या सहा वर्षांपासून तिथे राहणाऱ्या महिलेने राजकीय उदासीनतेवर बोट ठेवलं. “दरवर्षी हेच होतं. मी इथे सहा वर्षांपासून राहते. येथे काहीही चांगल्या सुविधा नाहीत. दुपारी साडेतीनच्या सुमारास एक दूधाचा पाऊच आणि एक जेवणाचं पॅकेट देतात. जास्त मागितलं तर ओरडतात. तपासणी पथक येतं तेव्हा फक्त वरवर स्वच्छता करतात,” ती म्हणाली.
पूर नियोजन: दावे विरुद्ध वास्तव
स्थानिकांचं म्हणणं आहे की, सुरत शहर जोरदार पावसासाठी तयार नाही. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते. महानगरपालिका ४,५०० लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचा दावा करते. पूरगेट्स, आरोग्य शिबिरे आणि जमिनीवरील अनेक पथकं रिमोटवर देखरेख करणाऱ्या पथकांशी समन्वय साधत असल्याचंही सांगितलं जातं. त्यांचं उद्दिष्ट ‘शून्य जीवितहानी' असल्याचंही ते ठासून सांगतात. पण तरीही, प्रत्येक पावसाळ्यात सुरतकरांना पाण्याच्या संकटाला सामोरं जावं लागतं, आणि प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.