NCERT आपल्या अभ्यासक्रमात केलेल्या बदलांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एनसीईआरटीने आता एका नवीन पुस्तकात देशाच्या फाळणीसाठी तीन प्रमुख व्यक्तींना जबाबदार धरले आहे. NCERT ने 'विभाजन के दोषी' नावाचे एक नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात भारताच्या फाळणीसाठी तत्कालीन नेत्यांना आणि एका राजकीय पक्षालाही दोषी ठरवले आहे. यात प्रामुख्याने मोहम्मद अली जिन्ना, लॉर्ड माउंटबेटन आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन होताच देशात मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
कोणत्या वर्गांसाठी आहे हे पुस्तक?
एनसीईआरटीने या विषयावर दोन वेगवेगळे मॉड्यूल जारी केले आहेत. एक मॉड्यूल इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या पुस्तकात जवाहरलाल नेहरू यांनाही फाळणीसाठी दोषी ठरवले असल्याचे म्हटले आहे. एनसीईआरटीच्या अधिकृत वेबसाइटवर हे पुस्तक उपलब्ध आहे आणि लवकरच ते छापून शाळांमध्ये वितरित केले जाणार आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक सामाजिक विज्ञान या विषयासोबत जोडले जाईल.
(नक्की वाचा- Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस)
पुस्तकात काय आहे?
या पुस्तकात तीन व्यक्तींची चित्रे दिली आहेत, ज्यात नेहरू, मोहम्मद अली जिन्ना आणि लॉर्ड माउंटबेटन यांचा समावेश आहे. पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, जिन्ना यांनी पाकिस्तान निर्मितीची मागणी केली. जिन्ना यांच्या मागणीपुढे काँग्रेस झुकली आणि त्यामुळे देशाची फाळणी झाली. तर माउंटबेटन यांनी फाळणीची प्रक्रिया पूर्ण केली.
(नक्की वाचा- Next-Gen GST: अन्नपदार्थ आणि औषधे स्वस्त होणार? टीव्ही, एसी, फ्रीज यासारख्या वस्तूंच्या किमतीही बदलणार?)
फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत, असेही पुस्तकात म्हटले आहे. आजवर पाठ्यपुस्तकातील इतिहासापेक्षा वेगळ्या मांडणीमुळे या पुस्तकावर आता काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या पुस्तकाचे शिक्षण मंत्रालयाने समर्थन केले असून, यापुढे यावर वाद होण्याची शक्यता आहे.