जिथं निसर्गाने सौंदर्याची उधळण केली होती, आता तिथंच निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमधील धराली हे गाव मंगळवारी दुपारी ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू आहे. यातून सुदैवाने बचावलेल्या 80 गावकऱ्यांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. वेळीच त्यांनी गाव सोडल्यामुळे ते बचावले आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती पाहता राज्य सरकारने 20 कोटींच्या मदतीची मंजुरी दिली आहे.
1 रेस्क्यू ऑपरेशन सुरू, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
जिल्हा मुख्यालयापासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर धराली गावाजवळ खीर गंगा नंदीवर ढफुटी झाल्याने 20-25 हॉटेल, होम स्टे आणि घर अक्षरश: वाहून गेले. जिल्हा प्रशासन लोकांची मदत करीत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये सैन्याचे साधारण 80 जवान सामील आहेत.

2 भागीरथी नदीला उधाण, मुसळधार पावसाचा अलर्ट
उत्तरकाशीमध्ये सातत्याने मुसळधार पावसामुळे भागीरथी नदीने रौद्र रुप धारण केलं आहे. वरच्या भागात मुसळधार पावसामुळे नदीचा जलस्तर वाढला आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

3 उत्तरकाशीच्या जवळ NDTV ची टीम अडकली
उत्तरकाशीपासून ३० किमी अंतरावरील रस्त्यावर ढिगाऱ्यांमुळे एनडीटीव्हीची टीम तिथे अडकली आहे. सतत भूस्खलन होत आहे. तिथे इतका ढिगारा आहे की तो साफ करण्यासाठी दुपारपर्यंत वेळ लागेल. टीम मागे वळून दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुन्हा मोठे दगड वाटेत पडल्याचं दिसत आहे. तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

4 रस्ता खटला, नेटवर्क नाही...
NDTV ची टीम भटवाडी येथे पोहोचली, मात्र पुढे रस्ता खूप खराब झाला होता. ज्यामुळे पुढे जाणं अशक्य होतं. उत्तरकाशीच्या भटवाडीमध्ये गंगोत्री नॅशनल हायवेचा ३० मीटरचा भाग खचला आहे. ज्यामुळे रेस्क्यू टीम पुढे जाऊ शकत नाही. भटवाडीहून साधारण ५० किलोमीटर दूर घरावी गाव आहे. येथे रेस्क्यू टीम जाणं अपेक्षित आहे.
5 परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने लोकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. बाधित लोक आणि त्यांचे कुटुंबीय 01374222722, 01374222126, 9456556431 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. हरिद्वार येथील जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरचे हेल्पलाइन क्रमांक 01374-222722, 7310913129, 7500737269 आहेत. टोल-फ्री क्रमांक - १०७७, ERSL टोल-फ्री क्रमांक - 112 वर देखील कॉल करता येईल.

6 वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरकाशीला पाठवलं...
उत्तरकाशीमध्ये मदत आणि समन्वय कार्याचे नेतृत्व करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, पोलिस महानिरीक्षक (एसडीआरएफ) अरुण मोहन जोशी, पोलीस महानिरीक्षक (गढवाल रेंज), राजीव स्वरूप, प्रदीप कुमार राय, अमित श्रीवास्तव (प्रथम) आणि सुरजीत सिंग पनवार, श्वेता चौबे, १ उपकमांडंट आणि ११ उपअधीक्षकांना तात्काळ उत्तरकाशीला पाठवण्यात आले आहे.
7 हर्षिलच्या शिबिरातून सैन्याचे नऊ जवान बेपत्ता
धरालीमध्ये ढगफुटीमुळे विनाशकारी घटनेनंतर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. खालच्या भागात हर्षिलजवळ एका शिबिरीतून नऊ भारतीय सैन्याचे जवान बेपत्ता आहेत. तर दोन जवानांना वाचविण्यात यश आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world