T20 World Cup: भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातील आजचा सामना भारतीय संघासाठी केवळ विजय मिळवण्यासाठी नाही, तर उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी नेट रन-रेट (NRR) सुधारण्याच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरला आहे. सुपर-8 फेरीतील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या मोठ्या विजयांमुळे भारताची वाट बिकट झाली असून, चेन्नईत होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियासमोर मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
कागदावर झिम्बाब्वेचा संघ दुबळा वाटत असला, तरी भारतासाठी हा सामना एखाद्या फायनलपेक्षा कमी नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतावर मिळवलेला 76 धावांचा विजय आणि विंडीजने झिम्बाब्वेला 102 धावांनी धूळ चारल्यामुळे भारत नेट रन-रेटच्या (NRR) बाबत बराच मागे आहे. आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला केवळ जिंकायचे नाही, तर झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत करायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेला पछाडणे का आहे कठीण?
सध्याच्या स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या जवळ पोहोचण्यासाठी भारताला 1.90 किंवा किमान 1 चा NRR गाठणे आवश्यक आहे. मात्र, हे गणित अत्यंत क्लिष्ट आणि अशक्यप्राय वाटत आहे.
(नक्की वाचा- Rinku Singh News: टीम इंडियाला मोठा धक्का! रिंकू वर्ल्ड कप सोडून अचानक घरी परतला)
भारताला काय करावे लागेल?
जर भारताला +1.000 NRR साध्य करायचा असेल, तर प्रथम फलंदाजी करताना भारताला किमान 116 धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल. उदा. भारताने 180 धावा केल्या तर झिम्बाब्वेला 64 धावांत रोखावे लागेल. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना जर झिम्बाब्वेने 151 धावांचे लक्ष्य दिले, तर भारताला ते केवळ 11.2 षटकांत (68 चेंडूत) ते गाठावे लागेल.
जर भारताला किमान +0.500 NRR साध्य करायचा असेल, तर प्रथम फलंदाजी करताना भारताला सुमारे 96 धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल. उदा. 180 धावा केल्यास झिम्बाब्वेला 84 धावांत गुंडाळावे लागेल. तर लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 151 धावांचे लक्ष्य दिले, तर भारताला 12.2 षटकांत 11.92 च्या रन-रेटने ते गाठावे लागेल.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026: 'विंडिज'च्या विजयामुळे पाँईंटटेबलमध्ये उलटफेर! भारत टेंशनमध्ये; सेमीफायनलची समीकरणे बदलली)
सूर्यकुमारच्या नेतृत्वाचा कस
चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फिरकीला साथ मिळते, तिथे इतक्या मोठ्या रन-रेट ने खेळणे आव्हानात्मक असेल. विंडीजचा +5.350 चा अवाढव्य रन-रेट पाहता, भारताला ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जवळ जाणे अनिवार्य आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि टीम इंडियाच्या फलंदाजांना आज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घ्यावा लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world