- एका कॉर्पोरेट मॅनेजरने महिन्याला २.५ लाख पगार असूनही मानसिक ताणतणावामुळे आनंदी नसल्याचे म्हटले आहे
- मॅनेजरने सांगितले की कमी पगाराच्या काळात अधिक आनंदी वाटायचे
- आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त कामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो असं तो म्हणतो
आजच्या कॉर्पोरेट जगतात वाढत्या पगारासोबतच मानसिक ताणतणावही प्रचंड वाढला आहे. पगार वाढला किंवा पदोन्नती मिळाली की आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र, अतिउच्च पगाराच्या नोकरीत गेल्यानंतरही माणूस सुखी असेलच असे नाही, याचे एक जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. एका कॉर्पोरेट मॅनेजरने रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली व्यथा मांडली आहे. महिन्याला 2.5 लाख रुपये पगार आहे. घरात सर्व सुखसोई आहे. असं असून ही आपण आनंदी नाही असं त्याने म्हटलं आहे. त्यामागचे कारण ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल.
'r/personalfinanceindia' या रेडिट पेजवर एका युझरने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, "आज आर्थिकदृष्ट्या मी पूर्णपणे स्थिर आहे. बँक बॅलन्स उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे. स्वतःचे घर आणि गाडी आहे. पण आज मला 2.5 लाख रुपये पगार मिळतो. पण खरं सांगू का ज्या वेळी मला महिन्याला 25 हजार रुपये पगार होता त्यावेळी मी जास्त आनंदी होतो असं त्याने म्हटलं आहे. आता लहानपणी पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली असली, तरी रस्त्यावरून खरेदी केलेले शर्ट, रस्त्यावर जेवणाचा घेतलेला आनंद या गोष्टी कुठेतरी मिस करत असल्याचं ही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कामाचे तास वाढले आहेत. त्यात आपण माणूस आहोत की यंत्र हेच समजायला मार्ग नाही असं ही तो सांगतो. यावर ही त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आठवड्याला 40 तासांपेक्षा जास्त काम करावे लागते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. खिशात पैसा असूनही तो स्वतःवर खर्च करण्याचा उत्साह उरलेला नाही. आपण केवळ एक 'उच्च पगाराचा नोकरदार' (High-earning spectator) झालो आहोत अशी त्याची भावना आहे. आपल्यातील माणूस हरवल्याची खंत त्याने व्यक्त केली. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यातून अनेकांनी असेच म्हटले आहे की पैशाने मानसिक शांतता विकत घेता येत नाही. त्याच कमेंटवर अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या तरुणाच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. पैशांच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला दिला आहे. तर काही जाणकारांनी, पैशांचा योग्य विनियोग आणि छंदांना वेळ दिल्यास या मानसिक ताणातून बाहेर पडता येऊ शकते, असे मत मांडले आहे. काही दिवसापूर्वी केरळमधील एका इंजिनिअर तरुणीने याच कारणामुळे नोकरीचा राजीनामा देत रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world