- ८२ वर्षीय आजोबा विस्मरणाच्या आजारामुळे स्कूटीवरून ७२ किलोमीटर दूर पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पोहोचले होते
- आजोबांकडे फोन होता पण ते कुठे आहेत हे सांगू शकत नव्हते, ज्यामुळे शोधकार्य कठीण झाले होते
- वारजे पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून आजोबांचे स्थान एक्सप्रेस वेवरील खंडाळा भागात शोधून काढले
एक अशी घटना समोर आली आहे ती पाहून तुम्ही ही आवाक व्हाल. पुण्यातील एका 82 वर्षीय आजोबांच्या विस्मरणाच्या आजारामुळे संपूर्ण कुटुंब काळजीत पडले होते. स्कूटीवरून निघालेले हे आजोबा चुकून 72 किलोमीटर दूर थेट पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पोहोचले. ज्या वेळी घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली त्यावेळी ते कुठेच भेटले नाहीत. पण त्यांच्याकडे फोन होता. त्या फोनवर त्यांच्या मुलींनी त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी फोन उचलला. पण आपण कुठे आहोत हे मात्र त्यांना सांगता येत नव्हते. त्यामुळे अडचण आणखी वाढली. त्यानंतर पुढेच काही तास सुरू झाला तो त्यांच्या शोधाचा थरार. पुणे पोलींसांनी जे काही केलं ते पाहाता त्यांचे जेवढे कौतूक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल.
30 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात एक महिला आपल्या पतीसह आली होती. तिने रडत रडत सांगितले की, तिचे 82 वर्षीय वडील दुपारपासून स्कूटी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांना विस्मरणाचा त्रास आहे. त्यांच्याकडे फोन आहे. ते फोन उचलत ही आहेत. पण आपण कुठे आहोत हे त्यांना सांगता येत नाही असं ही त्यांच्या मुलीने पोलीसांना सांगितलं. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे यांनी वडिलांशी फोनवर संवाद साधला. तेव्हा त्यांना वाहनांचा मोठा आवाज ऐकू आला. यावरून आजोबा कोणत्याही हायवेवर असावेत किंवा ट्रीफीक असलेल्या ठिकाणी असावेत असा अंदाज पोलीसांनी लावला.
त्यानंतर पोलीसांनी तातडीने आपली सुत्र हलवली. पोलिस अंमलदार शिरीष गावडे यांनी तांत्रिक मदतीने आजोबांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. लोकेशन समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. आजोबा वारजे येथून 72 किलोमीटर दूर पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील खंडाळा भागात असल्याचे आढळले. रात्रीचा अंधार आणि ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या मध्ये एक 82 वर्षांचे आजोबा स्कूटीसह अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला.
खंडाळा विभागातील महामार्ग पोलिस अंमलदार हनुमंत कोळी यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच त्यांनी आजोबांना शोधून सुरक्षित ताब्यात घेतले. आजोबा सुखरूप असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांनी तातडीने खंडाळा गाठवे. तिथे आजोबा सुखरूप होते. त्यानंतर त्यांनी खंडाळ्यातून पुण्याला घरी आणण्यात आले. पोलिसांची समयसूचकता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका मोठ्या अनर्था टळला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world