- केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आणि बेपत्ता आहेत
- वायनाड जवळ मेप्पाडी-कल्लाडी येथे भूस्खलन झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने बचावकार्य सुरू केले आहे
- भूस्खलनाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
Wayanad Landslide: सध्या देशातल्या वेगवेगळ्या भागात पाऊस होत आहे. महाराष्ट्रात ही पावसाचा जोर आहे. राज्यात मुंबईसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपून टाकले आहे. त्याच वेळी दक्षिणेतील केरळमध्ये ही पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. केरळमधून एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. केरळच्या वायनाडमध्ये अख्खा डोंगरच कोसळला आहे. त्याच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. डोंगर कोसळचानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ केरळच्या वायनाडचा आहे. या व्हिडीओत सुरूवातीला काही लोक धावताना दिसत आहे. काही क्षणातच त्यांच्या दिशेने डोंगराचा मोठा भाग येताना दिसत आहे. त्यात दगड, चिखल, माती यांचा मोठा लोंढा येतो. ते येताना दिसताना लोक धावताना दिसत आहेत. पण या लोंढ्याने सर्वांना आपल्या कवेत घेतलं. आधी भल्या मोठ्या पाण्याच्या टँकराला हवेत उडवलं. त्यानंतर वाटेत आलेल्या लोकांना आणी गाड्यांना ही त्याने आपल्या सोबत वाहून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणाराच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
केरळमधील वायनाड जवळ मेप्पाडी- कल्लाडी येथे बोगद्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी हे भूस्खलन झाले आहे. हे भूस्खलन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचं ही सांगितलं जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF ने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी बचाव कार्य ही सुरू केले आहे.
केरळ अग्निशमन व बचाव सेवा घटनास्थळावर आहे. शिवाय पोलीस आणि जिल्हा प्रशासन संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेत जे लोक हरवले आहेत त्याच्यासाठी आता शोध मोहिम राबवली जात आहे. सध्या या भागात पाऊस होत आहे. अशा स्थितीत ही शोध सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. केरळचे टी सिद्धीकी यांनी ही दरड नैसर्गिक पद्धतीने कोसळली नाही. तर त्याला मानव जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 2024 मध्ये ही याच भागत मोठं भूस्खलन झालं होतं. त्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. आता कलपेट्टा इथं सुरक्षित स्थळी लोकांना हलवण्यात आले आहे.