Dhanushkodi Last Road of India: भारताचा शेवटचा रस्ता कोणता विचारलं तर अनेकांना माहिती नसेल. दक्षिण भारताच्या टोकावर वसलेले धनुषकोडी हे ठिकाण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. भारताच्या मुख्य भूमीचा हा शेवटचा रस्ता नॅशनल हायवे 87 म्हणून ओळखला जातो, जो रामेश्वरमपासून सुरू होऊन अरिचल मुनई (Arichal Munai) येथे संपतो.
भारताच्या भूमीचा शेवटचा बिंदू आणि निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार म्हणून धनुषकोडी ओळखले जाते. तामिळनाडूतील रामेश्वरमपासून सुरू होणारा हा रस्ता केवळ एक प्रवास नसून इतिहास, पुराण आणि भूगोलाचा संगम आहे.
ठिकाण नेमके कुठे आहे?
रामेश्वरमपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर धनुषकोडी वसलेले आहे. हा रस्ता पंबन बेटाच्या दक्षिण टोकावर असून एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर असा विलोभनीय देखावा येथे पाहायला मिळतो. या रस्त्याच्या शेवटी अरिचल मुनई हा बिंदू आहे, जिथून श्रीलंका केवळ 18 ते २20 किलोमीटर अंतरावर आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ
धनुषकोडीचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच तो दुःखदही आहे. पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीरामांनी लंका विजयासाठी 'राम सेतू' बांधण्याची सुरुवात याच ठिकाणाहून केली होती. 'धनुषकोडी'चा अर्थ 'धनुष्याचे टोक' असा होतो.

Dhanushkodi Last Road of india
1964 पूर्वी धनुषकोडी हे एक गजबजलेले बंदर होते. मात्र, डिसेंबर 1964 मध्ये आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले. रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस आणि घरे जमीनदोस्त झाली. त्यानंतर सरकारने हे ठिकाण 'राहण्यायोग्य नाही' म्हणून घोषित केले.
रस्त्याचे खास आकर्षण काय?
या अरुंद रस्त्यावरून प्रवास करताना दोन्ही बाजूंना अथांग समुद्र दिसतो, जो अनुभव अत्यंत विलोभनीय असतो.चक्रीवादळात उरलेले पडके अवशेष आजही या शहराच्या जुन्या वैभवाची साक्ष देतात. हा तो शेवटचा बिंदू आहे जिथे रस्ता संपतो आणि तुम्ही भारताच्या शेवटच्या टोकावर उभे असल्याचा अनुभव घेता.
पर्यटकांसाठी सुलभता
पूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी वाळूतून चालणाऱ्या विशेष वाहनांची गरज लागायची. मात्र, आता NH 87 च्या विस्तारामुळे हा रस्ता खाजगी वाहनांसाठी पूर्णपणे खुला झाला आहे. अरिचल मुनईच्या पुढे वाहनांना परवानगी नाही, जेणेकरून तिथले नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world