Citizenship Documents: आधार हे नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षण (SIR) संदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आधार नागरिकत्वाचा पुरावा मानला जाऊ शकत नाही, त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं देखील याच प्रकराचा निर्णय दिला होता. त्यामुळे मतदार कार्ड, पॅन कार्ड किंवा आधार कार्डने नागरिकत्व सिद्ध होत नसेल, तर त्यासाठी काय आवश्यक आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई उच्च न्यायालयानं काय सांगितलं होतं?
मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान कोर्टानं एक महत्त्वाची टिप्पणी करत म्हटले की, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे केवळ ओळखपत्र किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठीची कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे बनवल्याने कोणीही भारताचा नागरिक बनत नाही. ही टिप्पणी करून हायकोर्टाने त्या बांगलादेशी नागरिकाला जामीन देण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय?
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेकवेळा स्पष्ट केले आहे की आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र नाही. आता बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षण याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाचा हा युक्तिवाद पूर्णपणे योग्य आहे की आधार निर्णायक पुरावा नाही. आधार कायद्यामध्येही याला नागरिकत्वाचा पुरावा मानलेला नाही.
( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
नागरिकत्व म्हणजे काय?
नागरिकत्व म्हणजे नक्की काय ? हे सर्वात आधी जाणून घेतलं पाहिजे. नागरिकत्व हा एक विशेष अधिकार आहे, जो कोणत्याही देशाकडून त्यांच्या नागरिकांना दिला जातो. यामध्ये नागरिकांना कायदेशीर हक्क, नोकरीचा अधिकार आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो.
भारतात, नागरिकत्व कायदा 1955 नुसार सरकारकडून लोकांना नागरिकत्वाचा अधिकार दिला जातो. याच कायद्यानुसार एखाद्याचे नागरिकत्व संपुष्टातही आणले जाऊ शकते. या कायद्यानुसार, भारताचा नागरिक कोणत्याही दुसऱ्या देशाचा नागरिक असू शकत नाही. म्हणजेच भारत दुहेरी नागरिकत्व पद्धत नाही.
( नक्की वाचा : झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहण यामध्ये काय आहे फरक? कधी विचार केलाय? )
नागरिकत्व कसे मिळते?
नागरिकत्व कायदा 1955 नुसार, तुमचा जन्म भारतात झाला असेल, तर तुम्ही भारताचे नागरिकत्व घेऊ शकता. यानुसार, 1 जुलै 1987 नंतर भारतात जन्मलेली व्यक्ती भारताची नागरिक मानली जाईल. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिच्या आई-वडिलांपैकी कोणी एक भारताचा नागरिक असेल. म्हणजेच, जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) हे देखील नागरिकत्व सिद्ध करणारे एक कागदपत्र असू शकते.
एखाद्या मुलाचा जन्म भारतात झाला नसेल आणि त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे आई-वडील भारताचे नागरिक असतील, तर त्या मुलाला नागरिकत्व मिळू शकते. परदेशात जन्मलेल्या मुलाची एका वर्षाच्या आत भारतीय दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या देशांतील लोकही भारत सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. यासाठी वेगवेगळ्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांसारख्या कागदपत्रांनी तुम्ही तुमचे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही.
- नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) दिले जाऊ शकते.
- जन्म प्रमाणपत्र ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगर निगमकडून दिले जाते.
- तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला स्थानिक जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयातून उपलब्धता नसलेले प्रमाणपत्र (non-availability certificate) घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही जन्म प्रमाणपत्र बनवू शकता.
- राज्य सरकारद्वारे दिले जाणारे अधिवास किंवा निवास प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुम्हाला त्या राज्यात 3 वर्षे राहावे लागेल. कुटुंब रजिस्टरची प्रत, जन्म प्रमाणपत्र किंवा शालेय प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही हे बनवू शकता.