Diabetes : आजकलच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामागे केवळ गोड खाणे हेच एकमेव कारण नसते, तर इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
रक्तातील साखर वाढण्यामागील कारणं...
मानसिक तणाव - मानसिक ताणामुळे रक्तातील साखर वाढते. जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा शरीर 'कोर्टिसोल' आणि 'एड्रेनालाईन' सारखे हार्मोन्स सोडते. यामुळे यकृतातील साखरेचे प्रमाण वाढते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. याशिवाय जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर शरीराची ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता मंदावते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील 'कोर्टिसोल' हार्मोन वाढतो, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील साखरेचा वापर नीट होत नाही. व्यायामामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, जी साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. केवळ साखरच नाही, तर मैद्याचे पदार्थ, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज झपाट्याने वाढते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची घनता वाढते, परिणामी रक्तातील साखर जास्त दिसून येते.
साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय कराल?
तणावमुक्त राहण्यासाठी योगासनं, ध्यान आणि आवडीचे छंद जोपासा. जेणेकरून मानसिक ताण कमी होईल. दिवसातून किमान ३० ते ४० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. आहारात पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. हे साखर हळूहळू शोषण्यास मदत करतात. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, जेणेकरून अतिरिक्त साखर लघवीवाटे शरीराबाहेर जाण्यास मदत होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world