नोकरीच्या मुलाखतीला जाताना आपण 'प्रामाणिकपणा' हेच सर्वोत्तम धोरण मानतो. मात्र, सध्या एका रिक्रूटरची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांच्याच विचार करण्याच्या पद्धतीला आव्हान दिले आहे. "मुलाखत ही तुमच्या सत्याची परीक्षा नसून, ती तुमच्या कौशल्यांची विक्री करण्याची एक कला आहे," असे या रिक्रूटरने म्हटले आहे.
मुलाखत म्हणजे एक 'नेगोशिएशन'
रिक्रूटरच्या मते, कंपनी तुमची कौशल्ये खरेदी करण्यासाठी बसली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला एका 'प्रॉडक्ट' प्रमाणे सादर केले पाहिजे. तुम्ही किती हतबल आहात हे दाखवण्यापेक्षा तुम्ही कंपनीसाठी किती मौल्यवान आहात, हे ठसवणे जास्त महत्त्वाचे असते.
(नक्की वाचा- Job News: नोकरी ठरतेय जीवघेणी! दरवर्षी 8 लाखांहून अधिक मृत्यू; कारणंही तितकंच चिंताजनक)
'या' 4 गोष्टी स्मार्ट पद्धतीने मांडा
- बेरोजगारीचा कालावधी : जर तुम्ही दीर्घकाळ नोकरी शोधत असाल, तर "मला नोकरी मिळत नाहीये" असे सांगू नका. त्याऐवजी, "मी माझ्या करिअरसाठी योग्य आणि आव्हानात्मक संधीच्या शोधात होतो," असे सांगा.
- अनेक ठिकाणी अर्ज करणे: तुम्ही 100 कंपन्यांमध्ये अर्ज केला असला, तरी ते सांगण्याची गरज नाही. "मी केवळ माझ्या स्किल्सशी सुसंगत असणाऱ्या निवडक नोकऱ्यांवरच लक्ष केंद्रित करत आहे," असे उत्तर देणे अधिक प्रभावी ठरते.
- कंपनीची माहिती: "मला या कंपनीबद्दल काहीच माहित नाही" असे म्हणणे तुम्हाला बेजबाबदार ठरवू शकते. मुलाखतीपूर्वी थोडा रिसर्च केल्यास तुम्ही कामासाठी गंभीर आहात असे दिसते.
- कामाचे स्वरूप: मागच्या कंपनीत "मी हे काम केले" सांगण्यापेक्षा, "माझ्या कामामुळे कंपनीला कसा फायदा झाला," हे आकड्यांसह सांगा.

(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
या सल्ल्यामुळे इंटरनेटवर दोन गट पडले आहेत. काहींच्या मते, कॉर्पोरेट जगात टिकण्यासाठी अशा 'स्मार्ट मार्केटिंग'ची गरज आहे. तर काहींनी याला 'प्रामाणिकपणाच्या विरोधात' म्हटले आहे. अनेक हायरिंग मॅनेजर्सचे म्हणणे आहे की, ते असे प्रश्न उमेदवाराचा आत्मविश्वास आणि त्यांची बाजारातील मागणी तपासण्यासाठी विचारतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world