जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुति सुझुकीने (Maruti Suzuki) तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने वाढत्या उत्पादन खर्चामुळे आपल्या गाड्यांच्या किमतीत 30 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता कंपनीने ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये म्हणून 'प्राइस प्रोटेक्शन स्कीम' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 14 जून 2026 पर्यंत कार बुक करणाऱ्या ग्राहकांना वाढीव किमतीऐवजी जुन्या दरातच कार खरेदी करता येणार आहे.
'या' 4 लोकप्रिय गाड्यांवर मिळणार ऑफरचा फायदा
मारुति सुझुकीने स्पष्ट केले आहे की, ही प्राइस प्रोटेक्शन स्कीम त्यांच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या मारूती अल्टो के10, मारुती एस प्रेसो, मारूती सेलिरियो, मारुती वॅगन आर या चार एंट्री-लेवल छोट्या गाड्यांवर लागू राहील. जर तुम्ही 14 जूनपूर्वी या गाड्यांपैकी कोणतीही एक कार बुक केली, तर तुमचे थेट हजारो रुपये वाचणार आहेत.
(नक्की वाचा- Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)
डीलर्सच्या फीडबॅकनंतर कंपनीचा मोठा निर्णय
मारुति सुझुकीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांच्या डीलर पार्टनर्सकडून आलेल्या फीडबॅकनंतर घेण्यात आला आहे. महागाईच्या या काळात जो मध्यमवर्गीय ग्राहक हिंमत करून कार खरेदीसाठी पुढे येत आहे, त्याला वाढलेल्या किमतींमुळे आपले पाऊल मागे घ्यावे लागू नये, या उद्देशाने कंपनीने हा सुरक्षित विंडोचा निर्णय घेतला आहे.
काय आहे मारुतिची 'सुहाना सफर' योजना?
किमती लॉक करण्यासोबतच मारुतीने मध्यमवर्गीयांसाठी 'सुहाना सफर' नावाची एक अनोखी फायनान्स स्कीम सुरू केली आहे. हा रिकरिंग डिपॉझिटशी जोडलेला एक ऑटो लोन प्लॅन आहे, जो ग्राहकांना मोठ्या ईएमआयच्या (EMI) ओझ्यापासून वाचवतो.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
स्कीम कशी काम करते?
या योजनेअंतर्गत ग्राहकाला कारच्या संभाव्य ईएमआय इतकीच रक्कम दरमहा एका आरडी (RD) खात्यात जमा करावी लागेल. या जमा रकमेवर ग्राहकाला बँकेकडून व्याजही मिळेल. 3 ते 6 महिन्यांनंतर जेव्हा ही आरडी मॅच्युर (पूर्ण) होईल, तेव्हा गोळा झालेली रक्कम त्याच बँकेकडून कार लोन घेताना 'डाऊन पेमेंट' म्हणून वापरता येईल. यामुळे ग्राहकावर एकाच वेळी मोठा आर्थिक भार पडत नाही.
कंपनीच्या मते, या 'सुहाना सफर' योजनेला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त लोकांनी याची चौकशी केली आहे, तर 1700 हून अधिक बुकिंग्ज देखील पूर्ण झाल्या आहेत.