केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांसाठीच्या 'E100 इंधन' नियमावलीला अधिकृत मंजुरी दिली आहे. हा निर्णय भारताच्या जैवइंधन मोहिमेला (Biofuel Mission) मोठी गती देणारा असून, भविष्यातील भारतीय वाहन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
12 जून रोजी नियमांवर स्वाक्षरी
नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, E100 इंधनाचा वापर अधिकृत करणाऱ्या नियमावलीवर स्वाक्षरी केली आहे. या नवीन फ्रेमवर्कमुळे आता वाहन उत्पादक कंपन्या, इंधन किरकोळ विक्रेते आणि चाचणी संस्थांना 100% इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या व्यावसायिक उत्पादनाची तयारी सुरू करता येणार आहे.
यापूर्वी भारताने एप्रिल 2026 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेआधीच यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सरकारच्या माहितीनुसार, इथेनॉलच्या या उपक्रमामुळे देशाचे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कच्चे तेल आयातीचे पैसे वाचले आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना 80 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
मारुती सुझुकी वॅगनआर देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार
या ऐतिहासिक घोषणेसोबतच, भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात एक क्रांती पाहायला मिळाली आहे. नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संयुक्तपणे E100 सुसंगत मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) ची नवीन एडिशन लाँच केली आहे.
सर्वसामान्यांची कार आता इथेनॉलवर
मारुती वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. आता ही कार पूर्णपणे इथेनॉलवर धावण्यास सक्षम झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होईल. केवळ मारुतीच नाही, तर टोयोटा, एमजी आणि ह्युंडाई या कंपन्या देखील येत्या काही आठवड्यांत आपली E100 सुसंगत मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. दुचाकी वाहनांचा विचार केल्यास, हिरो मोटोकॉर्पने आधीच दोन फ्लेक्स-फ्यूल मोटारसायकल लाँच केल्या आहेत, ज्या पूर्णपणे शुद्ध इथेनॉलवर चालू शकतात.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
E100 इंधनाचा सामान्य ग्राहकांना काय फायदा होणार?
इथेनॉल इंधनाचा वापर केल्यामुळे वाहनाचा इंधनाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. अनेक भागात E85 इंधनाचे दर सध्याच्या पेट्रोलपेक्षा खूपच कमी आहेत. 100% इथेनॉल इंधनामुळे कार्बनचे उत्सर्जन अत्यंत कमी होते, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल. इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून होत असल्याने थेट भारतीय कृषी क्षेत्राला आणि बळीराजाला मोठा आर्थिक फायदा होईल.