UPSC Success Story : एकापाठोपाठ तीन वेळा अपयशाचा धक्का, पण जिद्द सोडली नाही. अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत केवळ एका सवयीमध्ये बदल केला आणि वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी देशातील सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. ही थक्क करणारी यशोगाथा आहे जयपूरच्या नेहा ब्याडवाल हिची. नेहाचा हा प्रवास आज देशभरातील लाखो तरुण-तरुणींसाठी एक मोठा आदर्श बनला आहे. नेहानं नेमकी काय सवय बदलली, ती कशामुळे यूपीएससी परीक्षेत पास झाली? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नेहानं सोडली एक सवय
तीन वेळा अपयश आल्यानंतर नेहाने आपल्या अभ्यास पद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावेळी तिच्या लक्षात आले की, अभ्यासातील सर्वात मोठा अडथळा सोशल मीडिया आहे. विशेष म्हणजे त्यावेळी नेहाचे सोशल मीडियावर 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. मात्र, युपीएससीच्या ध्येयापुढे तिने या प्रसिद्धीचा मोह क्षणात बाजूला ठेवला. सलग 3 वर्षे तिने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे बंद केले. सोशल मीडिया सोडल्यामुळे तिचा अभ्यासाचा वेळ वाढला, एकाग्रता वाढली आणि उत्तर लेखनाचा सराव अधिक मजबूत झाला.
( नक्की वाचा : DMart News: झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी )
चौथ्या प्रयत्नात मिळवले यश
यूपीएससी परीक्षा 2021 मध्ये नेहाने आपल्या चौथ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक 569 मिळाला. तिला एकूण 960 मार्क्स मिळाले. अवघ्या 24 व्या वर्षी तिने हे उत्तुंग यश मिळवून दाखवले. पहिल्या तीन प्रयत्नांत निराशा पदरी पडूनही तिने हार मानली नाही, तर प्रत्येक अपयशातून धडा घेऊन स्वतःमध्ये सुधारणा केली.
नेहाचा शैक्षणिक प्रवास
नेहाचा जन्म 3 जुलै 1999 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. मात्र तिचे बालपण आणि शालेय शिक्षण छत्तीसगडमध्ये पार पडले. 12 वी पूर्ण झाल्यानंतर तिने रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे पदवीच्या परीक्षेत ती युनिव्हर्सिटी टॉपर राहिली होती.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
नेहाचे वडील श्रवण कुमार हे आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीच नेहाला युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा दिली आणि तयारीच्या संपूर्ण प्रवासात तिला भक्कम पाठिंबा दिला. नेहाचा हा प्रवास स्पष्टपणे सांगतो की, युपीएससीसारख्या परीक्षेत अभ्यासाइतकीच संयम, शिस्त आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते.