Kitchen Vastu Tips: तुम्ही देखील घरामध्ये मोजून पोळ्या (चपाती) तयार करता का? पण पोळ्या तयार करतानाच्या तुमच्या छोट्या-छोच्या सवयी घराच्या सुख-शांतीशी जोडलेल्या असू शकतात? हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत पंडित गौरव कुमार दीक्षित यांनी म्हटलंय की, वास्तू शास्त्रामध्ये असे मानले जाते की स्वयंपाकघर आणि तिथे तयार होणारे जेवण घराच्या वातावरणावर परिणाम करते. याच कारणामुळे पोळी तयार करताना काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तूनुसार पोळ्या मोजून तयार करणे, शिळ्या पिठाचा वापर करणे किंवा काही महत्त्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे शुभ मानले जात नाही. पोळी तयार करण्याशी संबंधित अशाच काही वास्तू नियमांबाबत माहिती जाणून घेऊया...
पोळ्या मोजून तयार करणे का चुकीचे मानले जाते?
वास्तूनुसार पोळ्या मोजून तयार करणे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की असे करणे सूर्य देवाचा अपमान मानला जातो, ज्यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात. नोकरी आणि व्यवसायात अडथळे येऊ शकतात, अशीही मान्यता आहे. म्हणूनच पोळ्या नेहमी गरजेपेक्षा थोड्या जास्त तयार केल्या पाहिजे जेणेकरून कोणताही पाहुणा किंवा गरजू भुकेला राहणार नाही.
पहिल्या आणि शेवटच्या पोळीचे महत्त्व
भारतीय परंपरेमध्ये पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढण्याची परंपरा आहे. वास्तू शास्त्रामध्येही हे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते, अशी मान्यता आहे. जर आजूबाजूला गाय नसेल, तर पहिली चपाती एखाद्या गरजूला देणेही चांगले मानले जाते.
शिळे पीठ वापरणे टाळण्याचा सल्लावास्तूनुसार पोळ्यांसाठी नेहमी ताजे पीठ मळणे अधिक चांगले मानले जाते. शिळ्या पिठामुळे नकारात्मकता वाढते, असे म्हणतात. म्हणूनच उरलेल्या पिठाचा दुसऱ्या दिवशी वापर करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने घरातील ताणतणाव आणि आर्थिक अडचणींची शक्यता कमी राहते, असे म्हटले जाते.
(नक्की वाचा : Abdominal Obesity: वाढती कंबर, यमराजाचा नंबर! महिलांचा नवा छुपा शत्रू, कमरेच्या वाढत्या घेराबाबत संशोधनातील 'ही' धक्कादायक माहिती)
शेगडीची दिशाही मानली जाते महत्त्वाची
वास्तू शास्त्रानुसार किचनमधील शेगडी दक्षिण-पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. तसेच पोळी तयार करताना आपले तोंड पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. यामुळे जेवणामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कुटुंबातील सदस्यांचे मानसिक संतुलन चांगले राहते, अशी मान्यता आहे. रात्री तवा किंवा कढई न स्वच्छ करता तशीच सोडणे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही. ही भांडी स्वच्छ करून कोरड्या जागेवर ठेवली पाहिजे. तसेच पोळपाट-लाटणे देखील नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वयंपाकघराची स्वच्छता घराच्या सुख आणि शांतीशी जोडलेली असते, अशी मान्यता आहे.
(नक्की वाचा : Fruit Salad: फ्रुट सॅलड खाणाऱ्यांनो सावधान! वेगवेगळी फळं एकत्र खाल्ल्यास शरीरात काय होतं? फोर्टिसच्या डॉक्टरांचा मोठा खुलासा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)