Buldhana News : वारीत खंड नाही! चुलीवर स्वयंपाक, 40 डिग्री तापमान; मात्र वारकऱ्यांनी 4 दिवसात पायी गाठलं शेगाव

राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असताना जालना जिल्ह्यातील वारकऱ्यांनी आध्यात्मिक शक्तीने सर्व अडचणींवर मात करून शेगावात दाखल होण्याची अभूतपूर्व कथा रचली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी
 
Buldhana News : राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असताना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथील १५०० पायदळ वारकऱ्यांनी आध्यात्मिक शक्तीने सर्व अडचणींवर मात करून शेगावात दाखल होण्याची अभूतपूर्व कथा रचली आहे. या पायदळ दिंडीने 8 वे वर्ष अविरत वारीचा प्रवास पूर्ण केला. ९०० पुरुष आणि ६०० महिलांसह सुमारे १५०० वारकरी चार दिवसांत १०५ किलोमीटरचा खंडित मार्ग पार करत शेगाव संस्थानात पोहोचले. 

गॅसच्या तुटवड्याची काळजी न करता लाकडाच्या जळत्या अग्निवर स्वयंपाक करत वारी अखंडित ठेवली, अशी अभिमानाची प्रतिक्रिया दिंडी अध्यक्षाने NDTV मराठी शी बोलताना दिली. नित्यनियमाने चालणाऱ्या या पायदळाने श्रद्धा, शिस्त, स्वच्छता आणि नम्रतेचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. 'गण गण गणात बोते'चा जप करत वारकरी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दिंड्यांनी मार्गक्रमण केलं. राज्यभर गॅस संकट असताना या वारकऱ्यांनी  आध्यात्मिक शक्तीने संकटावर मात करून शेगाव गाठलं. ही घटना प्रेरणादायी ठरली आहे. श्री गजानन महाराज संस्थानाने या दिंडीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार केला. या वारीने सिद्ध केले की, खरी श्रद्धा कोणत्याही भौतिक संकटाला पार करू शकते. पायदळ वारकरी आता शेगावात दर्शन घेऊन पुढील वर्षाच्या वारीसाठी सज्ज होत आहेत. ही दिंडी श्रीक्षेत्र शेगाव येथे आज दुपारी पोचली.

Advertisement

नक्की वाचा - Shirdi Sai Baba : साईंबाबांच्या प्रसादालयाच्या मेन्यूमध्ये मोठा बदल, प्रसाद वितरणावर निर्बंध

गॅस सोबत चाळीस डिग्री उन्हाचे चटके..

एकीकडे जालना जिल्ह्यातून निघालेली श्री संत गजानन महाराज भक्तांची पालखी जसजशी शेगावच्या जवळ पोहोचत होती, तस तसं त्यांना जिल्ह्यातील 40 डिग्री उन्हाचा सामना देखील करावा लागत होता. एकीकडे गॅस तुटवडा तर दुसरीकडे उन्हाचे चटके या दुहेरी संकटावर मात करत मुखात 'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन' याचा जयघोष करीत होते. केवळ श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाची आस त्यांना या संकटावर मात करत श्रींच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकली असं म्हणायला हरकत नाही.

Topics mentioned in this article