सुनिल दवंगे, प्रतिनिधी
sai baba shirdi : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीचा परिणाम आता धार्मिक स्थळांवरही दिसून येत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात गॅस बचतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रसादालयाच्या मेन्यूमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
शिर्डीतील साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार केलं जातं. तसेच भाविकांना मोफत दिल्या जाणाऱ्या बुंदी लाडू प्रसादाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. मात्र गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेता संस्थान प्रशासनाने प्रसाद वितरणावर काही मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फक्त एकच बुंदी लाडू प्रसादाचे पॅकेट देण्यात येणार आहे. यापूर्वी भाविकांना प्रसाद अधिक प्रमाणात उपलब्ध होत होता. मात्र गॅस बचत आणि प्रसादाची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
साई संस्थानमध्ये मोठा बदल...
साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज सुमारे दीड टन एलपीजी गॅसचा वापर होतो. विशेष म्हणजे वापरल्या जाणाऱ्या गॅसपैकी जवळपास निम्मा गॅस हा केवळ लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च होतो. त्यामुळे गॅसची बसत होण्यासाठी हा महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याचं साई संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी NDTV मराठी सोबत बोलताना स्पष्ट केलं आहे.
याशिवाय साई प्रसादालयातील जेवणाच्या मेनूमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी साईबाबा प्रसादालयात भाविकांना वरण-भात, दोन भाज्या, चपाती असं भोजन दिल जात होतं. मात्र आता यात बदल करत भाजी आणि वरणाचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे. त्यात आता मसाले भात दिला जात आहे. कमी गॅस लागणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देत अन्न तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. दररोज हजारो भाविकांसाठी भोजन बनवलं जात असल्याने गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे संभाव्य टंचाईचा विचार करून संस्थान प्रशासनाने ही खबरदारी घेतल्याचं दराडे यांनी सांगितले.
श्रीरामनवमीची मोठी तयारी...
दरम्यान, आगामी श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रसादालयाचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आणि सर्व भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी संस्थान प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. संस्थानला दररोज मोठ्या प्रमाणात गॅस लागतो. त्यामुळे गॅस साठवण्यासाठी संस्थानने 10 टन क्षमतेचे दोन स्टोअरेज टँक उभारले आहेत. या टँकमध्ये एकूण 20 हजार किलो गॅस साठवता येतो आणि हा साठा साधारणपणे 15 दिवस पुरतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संस्थानकडे सुमारे 12 टन गॅस साठा उपलब्ध होता. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संस्थानने तातडीने 15 टन क्षमतेचा आणखी एक गॅस टँकर मागवून साठा वाढवला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध गॅससाठा पुढील सुमारे 15 दिवस पुरेल, असे सांगण्यात येत आहे. गॅस पुरवठा सुरळीत राहिला तर प्रसाद वितरण पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र टंचाई वाढल्यास आणखी काही उपाययोजना करण्याची शक्यता संस्थान प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world