DCM Ajit Pawar Death Supriya Sule Reaction: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती येथे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये लँडिगच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा अंत झाला. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी ऐकून बारामतीसह अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एकीकडे कार्यकर्त्यांचा आक्रोश दुसरीकडे बड्या नेत्यांनाही अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सुप्रिया सुळेंचा एक शब्द
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे दिल्लीवरुन बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनी फक्त एका शब्दात प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटस अपलोड करत 'Devastated' असे लिहले आहे. devastated चा अर्थ आहे उद्ध्वस्त.. मन सुन्न झालं असा होतो.
"महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे," अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
रामदास आठवले, अंबादास दानवेंकडून श्रद्धांजली
"महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला. आज माझे मन खूप हेलावले आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक 'पॉवरफुल' नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचे पालन हे सर्वांसाठीच आदर्श होते. ते स्पष्टवक्ते होते, मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे. अशा या रोखठोक नेत्याचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे," असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही शोक व्यक्त केला आहे.
"अजितदादा... सुमारे चार दशकांच्या कठोर मेहनतीने उभे राहिलेले नेतृत्व एका क्षणात आपल्यातून गेले. शब्दाला जागणारे, प्रशासनावर उत्तम पकड असलेले आणि तळागाळातील लोकांशी घट्ट जोडले गेलेले एक उत्तुंग नेतृत्व आज अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने गमावले आहे. ही हानी पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या दुःखद क्षणात आम्ही सर्वजण पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत," असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.