Deputy CM Ajit Pawar Plane Crash Cause: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीमध्ये प्रचारसभेला जाण्यासाठी अजित पवारांच्या विमानाने मुंबईमधून उड्डाण घेतले. बारामतीजवळ उतरत असतानाच अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत आता माहिती समोर आली आहे.
कसा झाला विमान अपघात?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन विमान मुंबईमधून सकाळी 8.10 वाजता निघाले होते. सकाळी 8.50 ला विमान बारामतीमध्ये उतरणार होते.विमानाने बारामती विमानतळावर लँडिग करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान हेलकावे खावू लागले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरात आदळले. विमान कोसळताच अवघ्या काही क्षणात पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीत सापडले आणि जळून खाक झाले.
सुत्रांच्या माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. विमानाच्या पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला. पायलटने तात्काळ हवाई वाहतूक नियंत्रणाला कळवले. पायलटने मेडे फोन करून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर, पायलटने आपत्कालीन लँडिंग केले. एएआयबी सध्या संपूर्ण घटनेची चौकशी करेल. एएआयबीच्या चौकशीनंतर विमान अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
अजित पवार यांना घेऊ निघालेले विान VSR या खासगी कंपनीचे होते. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच प्रवासी होते. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट हे सर्वजण या विमानात होते. विमान उतरत असतानाच बिघाड झाल्यासारखा आवाज झाला. विमानतळावर उतरत नसल्याने दोनवेळा घिरक्याही घेतल्या. अशातच शेजारील शेतात विमान कोसळले.
अनेक जिल्हे बंद, कार्यकर्त्यांचा आक्रोश
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सासरवाडी असलेल्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा पाळला जात आहे. अजित पवारांच्या जाण्याने आमचं गाव पोरक झाले,अशा भावना गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. गावांमधील शाळांना सुट्य्या देण्यात आल्या असून कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे.विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world