DCM Ajit Pawar Plane Crash Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अजित पवारांच्या निधनाची बातमी धडकली अन् अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या निधनावरुन संशयाचं धुकं दाट होत असतानाच राजकीय वर्तुळातही मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळाल्या. आज एक महिना उलटूनही अजित पवार यांच्या अपघातप्रकरणाबाबत असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे अद्याप मिळाली नाहीत. नेमकं काय घडलं? या एका महिन्यात; वाचा...
एका महिन्यात काय घडलं?
अजित पवार बारामतीकडे रवाना: 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचा नियोजित बारामती दौरा होता, त्यासाठी त्यांना घेऊन व्हीएसआर या खासगी कंपनीचे विमान सकाळी ८.१० वाजता मुंबईकडून बारामतीच्या दिशेने रवाना झाले. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट हे सर्वजण या विमानात होते.
विमान दुर्घटनाग्रस्त: विमान ८.५० ला बारामती विमानतळावर उतरणार होते, मात्र लँडिग करताना विमानावरील नियंत्रण सुटले अन् दुर्घटनाग्रस्त झाले. सकाळी ९ वाजता या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत बातमी आली अन् महाराष्ट्रभर शोककळा पसरली.
अजित पवार यांचा मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा: लोकनेते अजित पवार यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्रभर पसरली अन् गावागावात दुकाने, बाजारपेठा बंद झाल्या. पुण्यासह अनेक शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी बारामतीकडे धाव घेतली.
राज्यात शासकीय दुखवटा: अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. सर्व शासकीय कार्यालयावरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले.
अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार: २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्यावर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशभरातील बडे नेते, राज्यातील नेते, कलाकार, उद्योग विश्वातील दिग्गज उपस्थित होते.
राजकीय वारसदार कोण? अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचेच त्यांचे राजकीय वारसदार ठरवण्याची चर्चा सुरु झाल्या. एकीकडे अंत्यसंस्कार होत असतानाच बारामतीमध्येच याबाबत बैठका झाल्याचं सांगण्यात आले. अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरु झाली.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी: 31 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीही ठरल्या.
सुनेत्रा पवार खातेवाटप: शपथविधीनंतर दोन दिवसात सुनेत्रा पवार यांचे खातेवाटप करण्यात आले. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली. 40 हून अधिक आमदारांची एकजूट राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड: २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आणि पार्थ पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
विलिनीकरणाची चर्चा बंद: एकीकडे राष्ट्रवादीत सुनेत्रा पर्व सुरु झाले असतानाच दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा मात्र मागे पडल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटील यांच्या घरी १५ हून अधिक बैठका झाल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्यांच्या निधनानंतर याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही आणि विलिनीकरणाची चर्चा बंद झाली.