योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गुरुवारी दुपारी सिलेंडरच्या भीषण स्फोटांनी मोठी खळबळ उडवून दिली. लोहारी मार्गावरील अहिल्याबाई होळकर कॉलनी परिसरात एका कॅटर्सच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे लागोपाठ 8 स्फोट झाले. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
स्फोटांनी हादरला परिसर
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विजय इंगळे यांच्या माऊली कॅटर्सच्या गोडाऊनमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच तिथे ठेवलेल्या सिलेंडरचा एक-एक करून स्फोट होऊ लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले. लागोपाठ झालेल्या 8 स्फोटांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
( नक्की वाचा : Doctor Suicide: दादरचा पिझ्झा,ताजमध्ये बर्थडे अन् अलिबागची ट्रीप; फैझीलच्या 'त्या' सवयीनं स्तुतीचा घेतला जीव! )
कशामुळे लागली आग?
ही आग नेमकी कशी लागली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाले आणि तिथून उडालेली ठिणगी जवळच असलेल्या कुटारावर पडली. कुटाराने पेट घेतल्यामुळे ही आग वेगाने पसरली आणि गोडाऊनपर्यंत पोहोचली. गोडाऊनमध्ये कॅटर्सचे मोठ्या प्रमाणावर साहित्य आणि गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले होते. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे स्थानिक नागरिकांना ती विझवणे कठीण झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत माऊली केटरर्सचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात व्यावसायिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या सिलेंडर साठवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: "बायकोची हत्या करून आलोय", पोलीस ठाण्यात शिरला अन् थेट कबुली दिली; कल्याणमधील धक्कादायक घटना )
सर्वसामान्यांना घरगुती गॅससाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असताना, केटरर्सकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा कसा उपलब्ध होतो, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. प्रशासन सध्या या घटनेचा पंचनामा करत असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world