
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच, अकोला शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पातूर-अकोला रस्त्यावर गणेश विसर्जन करून परतणाऱ्या 'जय बजरंग गणेश उत्सव मंडळा'च्या कार्यकर्त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एका 25 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
कसा झाला अपघात?
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'जय बजरंग गणेश उत्सव मंडळा'चे सदस्य गणेश विसर्जन करून कापसी तलावावरून अकोल्यातील आपल्या घरी परत येत होते. दुर्दैवाने, त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीवरील चारही तरुण रस्त्यावर फेकले गेले.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला )
मृत आणि जखमींची ओळख
या अपघातात 25 वर्षीय रामचंद्र बबन आंधळे याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले , रविंद्र माळी, विनोद डांगे आणि राहुल सुरेश कोंड हे 3 जण जखमी झाले आहेत.. या सर्व जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व तरुण अकोल्यातील गाडगे नगर येथील शिवसेना वसाहतीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. गणेश विसर्जनाच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेने विरजण पडले असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world