
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोल्यातून एका कष्टकरी व्यक्तीच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा पावसाने बळी घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पावसाचा तडाखा सुरूच आहेत. यातच पावसाच्या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कामावरुन घराच्या दिशेने निघालेल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रोहित संदलकर आपलं काम उरकून घराकडे निघाले होते. यावेळी जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली होती. यादरम्यान सायकलवरुन पडल्याने रोहितचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल समोर आला नसल्याने मृत्यूमागील नेमकं कारण सांगणं कठीण आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain : शेतात काम करताना गेला जीव, वीज कोसळून महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू
रोहितच्या मागे आई,पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दररोज हात मजुरी करून रोहित कुटुंबाचं पालन पोषण करीत होता. त्याच्या मागे आई कमलाबाई, पत्नी दीपा संदलकर, मुलगा सुजल 19 वर्षीय आणि मुलगी भूमी 15 वर्षीय असा एकंदरीत परिवार आहे.
काल 27 मे सायंकाळच्या दरम्यान साडेपाच वाजता दैनंदिन काम उरकून रोहित घराकडे निघाले होते. सूत्रांच्या माहितीवरून काल शहरातील अग्रसेन चौक, येथे रोहित पोहचला आणि गतिरोधकवर जोरदार पावसाच पाणी साचल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सायकलवरून पडून पावसाच्या तडाख्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. तर दमदार पावसामध्ये त्यांच्या सायकलला जोरदार मोटरसायकलची किंवा चारचाकी वाहनाची धडक दिल्यामुळेच त्यांच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान रोहितच्या मृत्यूमुळे शासनस्तरावर नैसर्गिक आपत्ती विभागाकडून त्यांच्या परिवाराला मदत द्यावी, अशी मागणी मृत रोहित धर्मराज संदलकर यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू की अपघातात मृत्यू याबाबतचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world