शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati School Protest: 'आमच्या लाडक्या राठोड सरांची बदली रद्द करा, नाहीतर आम्ही अन्नाचा कणही घेणार नाही', असा आक्रमक आणि तितकाच भावूक पवित्रा अमरावतीच्या कारंजा बहिरम येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या मुलींनी घेतला आहे.
शिक्षक सुनील राठोड यांची बदली झाल्यापासून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी चक्क जेवण आणि नाश्ता करणेही सोडून दिले आहे. आपल्या लाडक्या शिक्षकासाठी जिवाचा आकांत करणाऱ्या या विद्यार्थिनींनी थेट अमरावती जिल्हा परिषद मुख्यालय गाठले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.
काय आहे घटना?
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील ओलावा किती गडद असू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आज अमरावतीत पाहायला मिळाले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षक सुनील राठोड यांची बदली करण्यात आली होती. मात्र, ही बातमी शाळेत समजताच मुलांमध्ये निराशेचे वातावरण पसरले.
सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मुले त्यांच्याशी इतकी जोडली गेली आहेत की, त्यांच्या जाण्याने मुलांनी चक्क अन्नाचा त्याग केला आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राठोड यांची बदली झाल्यापासून अनेक मुलांनी घरी जेवण करणे बंद केले आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी आता पालकांना सतावत आहे.
( नक्की वाचा : Amravati News: अमरावती महापालिकेत स्वच्छतेवर चर्चा, अन् विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहातच मळली तंबाखू, पाहा VIDEO )
चिमुरड्यांचा एकच हट्ट
जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचलेल्या या चिमुकल्या मुलींचे डोळे वारंवार पाणावलेले पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या शिक्षकाला पुन्हा आपल्या शाळेत मिळवण्यासाठी या मुलींनी थेट प्रशासनाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत सरांची बदली रद्द होणार नाही, तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद कार्यालयातून उठणार नाही, असा हट्ट या मुलींनी संजिता महापात्र यांच्याकडे धरला आहे. लहान मुलांचा हा टोकाचा निर्णय आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून कार्यालयातील उपस्थित कर्मचारीही हेलावून गेले होते.
एकीकडे शासन शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे दावे करत असताना, दुसरीकडे एका आदर्श शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. सुनील राठोड यांच्या बदलीच्या निर्णयामुळे केवळ विद्यार्थीच नाही, तर पालकही अस्वस्थ आहेत. मुलांनी जेवण सोडल्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर विषयाकडे कशा पद्धतीने पाहणार आणि या चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.