APMC Market News: आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या नवी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) कारभारावर गेल्या काही काळापासून भ्रष्टाचाराचे काळे सावट पसरले आहे. घाम गाळून शेतकरी आपला माल बाजारात आणतो, परंतु येथील अपारदर्शक कारभार आणि वाढत्या गैरव्यवहारांमुळे बळीराजाचा व्यवस्थेवरील विश्वास उडू लागला आहे. नुकत्याच घडलेल्या लाचखोरीच्या घटना आणि नियमबाह्य प्रकारांमुळे या राष्ट्रीय बाजार समितीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर भ्रष्टाचाराचे सावट?
मे १९, २०२६ रोजी अँटी करप्शन ब्युरोने (ACB) वाशी APMC च्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील ऑनियन-पोटॅटो मार्केटमध्ये दोन अधिकाऱ्यांना कथित लाच स्वीकारताना अटक केली होती. या प्रकरणात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व सॅनिटेशन विभागाचे प्रभारी डेप्युटी सेक्रेटरी डॉ. दीपक आवटे आणि सॅनिटेशन इन्स्पेक्टर समीर म्हात्रे यांच्यावर ठेकेदाराकडून ₹१.४० लाखांची लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता. सॅनिटेशन आणि ड्रेनेज कामांच्या बिलांच्या मंजुरीसाठी सुमारे १५ टक्के कमिशनची मागणी केल्याचाही आरोप होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
APMC चे सचिव शरद झरे यांचे नावही यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या संदर्भात चर्चेत आल्याची चर्चा बाजारात आहे. तसेच APMC मधील कथित अवैध वसुलीमागे नेमके कोण आहे, या संदर्भात व्यापारी आणि शेतकरी वर्तुळात विविध चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.
यापूर्वीही वाशी APMC विविध आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली आहे. एप्रिल २०२४ मध्ये सुमारे ₹६२.०७ कोटींच्या गाळा वाटप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टॉयलेट ठेव्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप, पार्किंगमध्ये बनावट पावत्यांच्या माध्यमातून अवैध वसुली आणि इतर आर्थिक अनियमिततेची प्रकरणेही समोर आली होती.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळण्याऐवजी बाजारातील लिलाव प्रक्रियेतील अपारदर्शकता, वजनातील घोळ आणि विविध सेसच्या नावाखाली होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही नवी मुंबई शहराच्या लौकिकाला साजेसे वातावरण APMC परिसरात दिसत नाही, उलट अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, वाशी APMC मधील संपूर्ण कारभार डिजिटल करणे, सीसीटीव्हीची कडक नजर ठेवणे आणि सर्व व्यवहार पारदर्शक करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी आणि बाजार समितीची डाुरळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशासनाने भ्रष्टाचाराविरोधात कठोर व शून्य सहनशीलतेची भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Political News: खळबळजनक! भाजप नेत्याचा आमदार निवासात संशयास्पद मृत्यू; 7व्या मजल्यावरुन पडून अंत