मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. हिंदी भाषावादावरुन होणाऱ्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याने हे नव्या युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. अशातच ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे.
काय म्हणाल्यात आशा भोसले?
दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दिवंगत संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आशा भोसले यांनी ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चांवर महत्त्वाचे विधान केले.
"मला राजकारणामध्ये आशिष शेलार एवढेच माहित आहेत. बाकी कुठलेही लोक माहित नाहीत. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही, हे राजकारण मला नकोच आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच हिंदी भाषा अनिवार्य मुद्द्यावर प्रश्न विचारला असता राजकारणावर बोलणार नाही," असं उत्तरही आशा भोसले यांनी दिले. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.