सुरज कसबे, पुणे: आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असून माऊलींच्या पालखी सोहळ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला असून,आज माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून येथून राजा-प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे.
अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी, पुणे येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली, तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत.
(नक्की वाचा- ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)
दरम्यान, 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांचे तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान आहे. 6 जुलै रोजी दोन्ही पालख्यांचे पंढरपूर नगरीमध्ये आगमन होईल. याचदिवशी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल.