आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रति दिंडी 20,000 रुपये देण्यात येणार आहे. त्यानुसार 2 कोटी 80 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या संदर्भातील 14 जून आणि 17 जून 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिंडीला सरकारकडून 20 हजार रूपये मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे. या विभागातून हा निधी दिला जाईल असं पहिले सांगितलं जात होते. तसं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केलं होतं.
दरम्यान पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात आलं आहे.