- आषाढी वारीत ख्रिस्ती धर्माचे तरुण पारंपरिक वेशभूषा करून विठू नामाचा जयघोष करत सहभागी झाले होते
- वसईतील ख्रिस्ती तरुणांनी दिवे घाट ते सासवड असा दहा किलोमीटरचा वारीचा प्रवास केला
- या वारीत सहभागी होऊन त्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला
आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकरत आहे. वारी ही महाराष्ट्राची एक परंपरा संस्कृती बनली आहे. या वारीत कोणाची जात नसते. कोणाचा धर्म नसतो. इथं असतं ते फक्त विठू नाम. विठू नामाच्या गजरात सर्व जण तल्लीन झाले असतात. त्याचा एक अनुभव सध्या वारीत येताना दिसत आहे. या वारीत ख्रिस्ती धर्माचे तरुण सहभागी झाले आहेत. त्यांना या वारीची भलतीच भूरळ पडली आहे. त्यामुळे हे ख्रिस्ती धर्माचे तरुण दिवे घाट ते सासवड असं 10 किलो मिटरचं अंतर त्यांनी पायी वारीत करत पार केलं. यावेळी त्यांनी हा अनुभव शब्दात सांगता येत नाही असं सांगितलं.
हे सर्व ख्रिस्ती तरुण वसईतील आहेत. त्यांना वारीबाबत ऐकलं होतं. वारी बाबत वाचलं होतं. वारी व्हिडीओच्या माध्यमातून पाहिली होती. पण यावेळी त्यांना स्वत: वारीत सहभागी व्हायचं होतं. म्हणून त्यांनी पारंपारीक वेशभूषा करत वारीत सहभाग नोंदवला. वारीत ते नुसते सहभागी झाले नाहीत तर त्यांनी विठूनामाचा जयघोष ही केला. या वारीत सहभागी होवून त्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी या वारीत सहभागी होतात. या वारकऱ्यांसोबत हे ख्रिश्चन तरुणी सहभागी झाले होते. ते इथलं वातावरण पाहून भारावून गेले होते. त्यांच्यासाठी हा अनुभव जिवनाचा अनुभव ठरला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
कपाळाला गंधाचा टिळा, पारंपरिक वस्त्र आणि गळ्यात टाळ घालून हे तरुणी वारीत सहभागी झाले होते. त्यांची उपस्थिती या वारीत प्रखर्षाने जाणवत होती. अॅड. जॉर्ज फरगोस यांच्या संकल्पनेतून याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की 'वारी ही भक्ती, प्रेम,समता,यांचा अखंड प्रवाह आहे. ते पुढे म्हणाले की त्यांचे मित्र अॅड. सिद्धेश नाईक हे दरवर्षी वारी करतात. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली. त्यामुळे या वर्षी प्रत्यक्ष वारीत सहभागी होता आले असं ही त्यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराजांचे विचार हे आपल्यासाठी ही आदर्श आहेत हे सांगायला ते विसरले नाहीत.
वारीची परंपरा ही आजची नाही. तर तिला 800 वर्षांचे अधिष्ठान आहे. ती अखंड पणे सुरू आहे. अशा या वारीचा आपल्याला अनुभव घ्यायचा होता. ही वारी हा फक्त प्रवास नाही, तर मनाला लाभलेला आत्मिक स्पर्श होता हे सांगायला ते विसरले नाहीत. या वारीने आपल्याला एक जिवनातील मोठी आठवण दिली आहे. वसईतील वकील, जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. जॉर्ज फरगोस यांच्या संकल्पनेतून वारीचे नियोजन करण्यात आले. यात अॅड. अजय परेरा, अॅड. अविश फरेरा, अॅड. प्रीतेश देशमुख, अॅड. सुयश ठाकूर आणि अॅड. हर्षल राऊत यांचा हातभार लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world